
कोलकाता : पश्चिम बंगालला अस्थिर करण्यासाठी सीमा सुरक्षा दल (बीएसएफ) बांगलादेशातील घुसखोरांना पश्चिम बंगालमध्ये घुसण्यास मदत करीत असल्याचा आरोप राज्याच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी गुरुवारी केला. बीएसएफची ही वृत्ती म्हणजे केंद्र सरकारची रूपरेषा असल्याचे स्पष्टपणे जाणवते, असेही बॅनर्जी म्हणाले.
इस्लामपूर, सीताई, चोप्रा आणि अन्य सीमाभागांमधून बीएसएफ घुसखोरांना भारतीय हद्दीत येऊ देत असल्याची आमच्याकडे माहिती आहे. इतकेच नव्हे, तर बीएसएफ जनतेचा छळ करीत असून राज्याला अस्थिर करण्याचा प्रयत्न करीत आहे, असेही बॅनर्जी यांनी राज्याच्या मुख्यालयात घेतलेल्या प्रशासकीय आढावा बैठकीत सांगितले.
या सर्व प्रकाराचा बोलविता धनी केंद्र सरकार आहे, परंतु सीमेच्या दोन्ही बाजूला आम्हाला शांतता हवी आहे, आमचे बांगलादेशशी चांगले संबंध आहेत. बांगलादेशी घुसखोरांचे वास्तव्य कुठे आहे त्याचा ठावठिकाणा शोधून काढण्याचे आदेश ममता यांनी पोलीस महासंचालकांना दिले आहेत.
बीएसएफ यासाठी राज्य सरकारला दोष देऊ पाहात आहे. त्यामुळे घुसखोरी केल्यानंतर हे घुसखोर कुठे वास्तव्य करीत आहेत त्याचा शोध घेण्यास सांगण्यात आले असून याबाबत आपण केंद्र सरकारला खरमरीत पत्र लिहिणार आहोत, असेही मुख्यमंत्री म्हणाल्या.