
पंजाबच्या फिरोजपूर येथे भारत-पाकिस्तान आंतरराष्ट्रीय सीमेवरील झीरो लाइनवर बुधवारी दुपारी भारतीय सीमा सुरक्षा दलाचा (बीएसएफ) एक जवान पी. के. सिंह चुकून सीमारेषा ओलांडून पाकिस्तानच्या हद्दीत गेला असता पाकिस्तानी रेंजर्सनी या जवानाला ताब्यात घेतले आहे. जवानाची सुटका करण्यासाठी पाकिस्तान रेंजर्ससोबत फ्लॅग मीटिंग्स घेतल्या जात आहेत, असे गुरुवारी बीएसएफच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
द हिंदूच्या वृत्तानुसार, १८२ व्या तुकडीतील कॉन्स्टेबल पी. के. साहू हे बुधवारी कुंपणाच्या पलीकडे शेतकऱ्यांसोबत असताना फिरोजपूर सीमेजवळ चुकून पाकिस्तानच्या हद्दीत गेले आणि त्यावेळी त्यांना ताब्यात घेण्यात आले. साहू हे पश्चिम बंगालचे रहिवासी असून, त्यांनी वर्दी घातली होती आणि त्यांच्याकडे सर्विस रायफलही होती. ते सावलीत विश्रांतीसाठी थोडे पुढे गेले असताना रेंजर्सनी त्यांना अटक केली. पाकिस्तानच्या माध्यमांनी साहू यांचे डोळ्यांवर पट्टी बांधलेले फोटो प्रसिद्ध केले आहेत. तथापि, एका अधिकाऱ्याने सांगितले की अशा घटना सामान्य आहेत आणि दोन्ही बाजूंमध्ये यापूर्वीही घडल्या आहेत.
शेतकऱ्यांना बीएसएफच्या उपस्थितीत कुंपणाच्या काही मीटर पुढे जाऊन शेती करण्याची मुभा असते. झीरो लाइन क्षेत्रामध्ये शेतकऱ्यांना शेती करण्यासाठी विशेष परवानगी दिली जाते. पेरणी आणि काढणीच्या वेळेला ‘बीएसएफ’चे जवान तैनात असतात. दरम्यान, जवानाला भारतात माघारी आणण्यासाठी ‘बीएसएफ’चे अधिकारी पाकिस्तान रेंजर्ससोबत चर्चा करीत आहेत.
पहलगामममध्ये पर्यटकांवर झालेल्या भ्याड हल्ल्यामुळे भारतात पाकविरोधी वातावरण तापलेले असताना आणि दोन्ही देशांमध्ये तणाव वाढलेला असताना ही घटना घडली आहे.