
पाटणा : काँग्रेसचे खासदार आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी शनिवारी बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यावर जोरदार हल्ला चढवला. “बिहार सरकारने केलेली जात जनगणना खोटी आहे. देशात जात जनगणना योग्य पद्धतीने करावी लागेल. जात जनगणनेशिवाय देशातील सर्वांचा विकास होऊ शकत नाही,” अशा शब्दांत राहुल गांधी यांनी विद्यमान सरकारवर टीकास्त्र सोडले.
पाटणा येथे शनिवारी झालेल्या संविधान सुरक्षा परिषदेत काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी म्हणाले की, “देशातील जातींची खरी परिस्थिती शोधणे आवश्यक आहे. मी संसदेत पंतप्रधान मोदींना सांगितले की, आम्ही तुमच्यासमोर जात जनगणना लोकसभा आणि राज्यसभेत मंजूर करून घेऊ. त्यात देशातील प्रत्येक जातीचा सहभाग असायला हवा. लोकसभा आणि राज्यसभेतील ५० टक्के आरक्षणाची भिंत आम्ही तोडू. जात जनगणना ही देशासाठी एक्सरे आणि एमआरआयसारखी आहे. कोणत्या वर्गात किती लोक आहेत, हे यातून कळेल.”
राहुल गांधी यांनी यावेळी रा. स्व. संघाचे प्रमुख मोहन भागवत यांच्या विधानाचाही समाचार घेतला. गंगा गंगोत्रीतून उगम पावली नाही तसेच १५ ऑगस्ट १९४७ रोजी भारताला स्वातंत्र्य मिळाले नाही, असे मोहन भागवत म्हणत असतील तर ते भारतीय संविधान नाकारत आहेत. ते भारतातील प्रत्येक संस्थानातून डॉ. आंबेडकर, भगवान बुद्ध आणि महात्मा गांधी यांची विचारसरणी पुसून टाकण्याचा प्रयत्न करत आहेत.