
नवी दिल्ली : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (सीबीएसई) २०२६ पासून दहावीची परीक्षा वर्षातून दोनदा घेण्यास मान्यता दिली आहे. त्यामुळे पुढच्या वर्षीपासून ‘सीबीएसई’च्या दहावी बोर्डाच्या वर्षातून दोन वेळा परीक्षा घेतल्या जातील. पहिल्या टप्प्यात फ्रेब्रुवारी आणि दुसऱ्या टप्प्यात मे महिन्यात या परीक्षा होतील. पहिल्या टप्प्यात उपस्थित राहणे बंधनकारक करण्यात आले आहे, तर दुसऱ्या टप्प्यातील परीक्षा हा पर्याय आहे.
मुलांचे अंतरिम मूल्यांकन केवळ एकदाच केले जाणार आहे. ‘सीबीएसई’ बोर्डाच्या या निर्णयामुळे विद्यार्थ्यांना गुणपत्रिकेत सुधारणा करण्याची संधी मिळणार आहे. जर एखाद्या विद्यार्थ्याला पहिल्या टप्प्यातील परीक्षेत कमी गुण मिळाले तर त्याला दुसऱ्या टप्प्यातील परीक्षेत चांगली कामगिरी करण्याची संधी आहे. केंद्रीय माध्यमिक शिक्षण बोर्डाने १० वीच्या वर्गासाठी वर्षातून दोनदा परीक्षा आयोजित करण्यास मान्यता दिली आहे.
का घेतला निर्णय?
‘सीबीएसई’ने हा निर्णय केंद्राच्या नवीन शैक्षणिक धोरणाच्या शिफारशीवरून घेतला आहे. त्याचा हेतू मुलांवरील मानसिक दडपण आणि तणाव कमी करणे हा आहे. ज्यामुळे मुलांना त्यांच्या चुका सुधारण्याची संधी मिळेल. विद्यार्थ्याच्या प्रतिभेचे पूर्ण मूल्यांकन एकाच परीक्षेद्वारे करता येत नाही, असे बोर्डाचे मत बनले आहे. फेब्रुवारी महिन्यात घेण्यात आलेल्या परीक्षेचा निकाल हा एप्रिल महिन्यात जाहीर केला जाईल. तर मे महिन्यात घेण्यात आलेल्या परीक्षेचा निकाल हा जून महिन्यात जाहीर केला जाईल. दुसऱ्या परीक्षेत विद्यार्थी एकूण तीन विषयात आपले गुण वाढवण्यासाठी प्रयत्न करू शकतात. या विषयांत विज्ञान, गणित, सोशल सायन्स आणि भाषा विषयांचा समावेश आहे.