बीएसएनएलसाठी पुनरुज्जीवन पॅकेज केंद्राकडून मंजूर;मोदींच्या अध्यक्षतेखाली घेतला निर्णय

दर्जा सुधारणे हे त्याचे उद्दिष्ट असेल, त्याचा वापर तोटा कमी करण्यासाठी होईल आणि कंपनीचे फायबर जाळे वाढवण्याचाही प्रयत्न केला जाईल
बीएसएनएलसाठी पुनरुज्जीवन पॅकेज केंद्राकडून मंजूर;मोदींच्या अध्यक्षतेखाली घेतला निर्णय

केंद्रीय मंत्रिमंडळाने ‘बीएसएनएल’साठी १.६४ लाख कोटी रुपयांचे पुनरुज्जीवन पॅकेज बुधवारी मंजूर केले. केंद्रीय माहिती व प्रसारणमंत्री अश्विनी वैष्णव यांनी ही माहिती दिली. “पॅकेजमध्ये तीन मुख्य बाबी असतील, बीएसएनएल सेवांचा दर्जा सुधारणे हे त्याचे उद्दिष्ट असेल, त्याचा वापर तोटा कमी करण्यासाठी होईल आणि कंपनीचे फायबर जाळे वाढवण्याचाही प्रयत्न केला जाईल,” असे वैष्णव यांनी सांगितले. “या पॅकेजनंतर ‘बीएसएनएल’ एआरपीयू १७०-१८० रुपयांपर्यंत वाढवण्यासाठी ४-जी सेवांचा विस्तार करू शकेल,” असेही वैष्णव यांनी सांगितले. केंद्र सरकारने बीएसएनएलच्या पुनरुज्जीवनासाठी एक लाख ६४,१५६ कोटी रुपयांचा विशेष निधी मंजूर केला आहे. याशिवाय, मंत्रिमंडळाने भारत संचार निगम लिमिटेड (बीएसएनएल) आणि भारत ब्रॉडबँड नेटवर्क लिमिटेड (बीबीएनएल) यांच्या विलीनीकरणालाही मंजुरी दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळाच्या कॅबिनेट समितीने हा मोठा निर्णय घेतला आहे.

बीएसएनएल कंपनीच्या विकासाला गती देण्यासाठी केंद्र शासनाने हे विशेष पॅकेज जाहीर केले आहे. त्यामुळे येत्या काळात बीएसएनएलची सेवा अधिक गतिमान होण्यास मदत होणार आहे. कारण, गेल्या काही वर्षांपासून बीएसएनएल सेवेबाबत ग्राहकांकडून तक्रारी वाढलेल्या दिसून येत आहेत. त्यामुळे ग्राहकांना दर्जात्मक सेवा देण्यासाठी केंद्र शासनाने हे विशेष पॅकेज दिले आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in