केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! महागाई भत्त्यात २ टक्के वाढ

केंद्रीय मंत्रिमंडळाने शुक्रवारी सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात २ टक्क्यांची वाढ करण्यास मंजुरी दिली. या दुरुस्तीमुळे महागाई भत्ता आता ५३ टक्क्यांवरून ५५ टक्के होणार आहे.
संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र
Published on

नवी दिल्ली : केंद्रीय मंत्रिमंडळाने शुक्रवारी सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात २ टक्क्यांची वाढ करण्यास मंजुरी दिली. या दुरुस्तीमुळे महागाई भत्ता आता ५३ टक्क्यांवरून ५५ टक्के होणार आहे. ही वाढ सातव्या वेतन आयोगांतर्गत झाली आहे. सरकारने आठवा वेतन आयोगही स्थापन केला आहे. नवीन वेतन आयोगाच्या शिफारशी जानेवारी २०२६ पासून लागू होण्याची शक्यता आहे.

सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशींनुसार केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या भत्त्यांमध्ये वर्षातून दोन वेळा वाढ केली जाते. ही वाढ सहामाही तत्त्वावर होते. यापूर्वी जुलै २०२४ मध्ये महागाई भत्ता ५० टक्क्यांवरून ५३ टक्के करण्यात आला होता. यात ३ टक्के वाढ झाली होती. आता नव्या निर्णयानुसार भत्त्यात २ टक्के वाढ करण्यात आली आहे. ही वाढ जानेवारी २०२५ ते जून २०२५ पर्यंतची आहे.

सरकारने मार्च महिन्यात भत्त्यात वाढ करण्याची घोषणा केली असली तरी केंद्रीय कर्मचाऱ्यांना जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्याचे भत्तेही थकबाकी म्हणून मिळणार आहेत. जर केंद्रीय कर्मचाऱ्याचे मूळ वेतन १९,००० रुपये असेल तर त्या कर्मचाऱ्याला १०,०७० रुपये महागाई भत्ता मिळत होता. आता २ टक्के वाढीनंतर हा भत्ता १०,४५० रुपये होईल. त्यामुळे केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या भत्त्यात ३८० रुपयांची वाढ करण्यात आली आहे.

logo
marathi.freepressjournal.in