केंद्र सरकारची ‘अग्निपथ योजना’ तरुणांना ४ वर्षे सैन्यात सेवा करण्याची मिळणार संधी

भरती झालेल्यांना सहा महिन्यांचे प्रशिक्षण दिले जाईल. तर, उर्वरित वेळ ३.५ वर्षे तो सैन्यात कर्तव्य बजावेल
File Photo
File PhotoANI

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी संरक्षण दलांसाठी ‘अग्निपथ भरती योजने’ची घोषणा केली आहे. याअंतर्गत भारताच्या तिन्ही सैन्यदलांमध्ये चार वर्षांसाठी तरुणांची भरती केली जाणार आहे, ज्याला ‘टूर ऑफ ड्यूटी’ असे नाव देण्यात आले आहे. याद्वारे भरती होणाऱ्या तरुणांना ‘अग्निवीर’ म्हणून ओळखले जाईल.

दोन आठवड्यांपूर्वी नौदल, लष्कर आणि हवाई दलाच्या प्रमुखांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना अग्निपथ योजनेची माहिती दिली होती. लष्करी व्यवहार विभाग त्याची अंमलबजावणी करत आहे. चार वर्षांनंतर, या योजनेंतर्गत भरती झालेल्या अग्निवीरांच्या प्रत्येक बॅचमधील २५ तरुणांना तिन्ही सेना दलात पुढे काम करण्याची संधी मिळणार आहे. तर उर्वरित तरुणांची सेवा समाप्त केली जाईल.

“सुरक्षाविषयक कॅबिनेट समितीने मंगळवारी ऐतिहासिक निर्णय घेऊन ‘अग्निपथ’ या परिवर्तनीय योजनेला मंजुरी दिली आहे. याअंतर्गत भारतीय तरुणांना सशस्त्र सेवेत सामील होण्याची संधी दिली जाईल,” असे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी म्हटले आहे.

शहीद झाल्यास अग्निवीराच्या कुटुंबाला मिळणार एक कोटी

जर अग्निवीराने सेवेदरम्यान सर्वोच्च बलिदान दिले तर त्याच्या कुटुंबाला एक कोटी रुपयांची मदत दिली जाणार आहे. याशिवाय अपंगत्व आल्यास ४८ लाख रुपयांची मदत दिली जाणार आहे.

मासिक पगार असा असेल

‘अग्निपथ मॉडेल’अंतर्गत सैन्यात (पीबीओर) पेक्षा कमी दर्जाच्या अधिकाऱ्यांची भरती केली जाईल. चार वर्षांच्या सेवेमध्ये सहा महिन्यांचा प्रशिक्षण कालावधी देखील समाविष्ट आहे. अग्निपथच्या माध्यमातून सैन्याचा भाग बनलेल्या सैनिकांना दरमहा ३० हजार ते ४० हजार रुपये पगार मिळणार आहे. यासोबतच त्यांना ४८ लाख रुपयांचा विमा मिळणार आहे. मात्र, त्यांना पेन्शन मिळणार नाही. या सैनिकांना ‘अग्निवीर कौशल्य प्रमाणपत्र’ देखील मिळेल, जे त्यांना सैन्यात सेवा दिल्यानंतर इतर नोकऱ्या मिळवण्यास मदत करेल.

संरक्षण दलावरील खर्च होणार कमी

‘टूर ऑफ ड्यूटी’चा उद्देश संरक्षण दलांचा खर्च आणि आयुर्मान कमी करणे हा आहे. या योजनेच्या अंमलबजावणीमुळे भारतीय सैन्यातील सरासरी वय ३५ वर्षांवरून २५ वर्षांपर्यंत कमी होईल. अग्निपथ योजनेंतर्गत लष्कराच्या तिन्ही दलांमध्ये पहिल्या वर्षी ४५ हजारांहून अधिक तरुणांची भरती होऊ शकते. ही भरती प्रक्रिया सहा महिन्यांच्या अंतराने वर्षातून दोनदा होईल. ही योजना यशस्वी झाल्यास सरकारचे पगार, भत्ते आणि पेन्शनसाठी हजारो कोटी रुपयांची बचत होईल, असा सशस्त्र दलाचा अंदाज आहे.

अग्निवीरांची भरती कशी होणार?

१७. ५ वर्ष ते २१ वर्षांपर्यंतचे उमेदवार या योजनेअतर्गंत अर्ज करु शकतात. भरती झालेल्यांना सहा महिन्यांचे प्रशिक्षण दिले जाईल. तर, उर्वरित वेळ ३.५ वर्षे तो सैन्यात कर्तव्य बजावेल. सध्या एक सैनिक १७-२० वर्षांपर्यंत सेवा करतो.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in