केंद्र सरकारचा मोठा निर्णय; कडधान्याची आयात बंद होणार

केंद्र सरकारने डिसेंबर २०२७ पर्यंत भारताला कडधान्यांच्या उत्पादनात स्वावलंबी बनवण्याच्या दिशेने एक मोठा निर्णय घेतला आहे.
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; कडधान्याची आयात बंद होणार

नवी दिल्ली : केंद्र सरकारने डिसेंबर २०२७ पर्यंत भारताला कडधान्यांच्या उत्पादनात स्वावलंबी बनवण्याच्या दिशेने एक मोठा निर्णय घेतला आहे. देशातील शेतकऱ्यांना अधिकाधिक तुरीच्या डाळीची लागवड करता यावी यासाठी सरकारने एक मोठी योजना सुरू केली आहे. सरकारी एजन्सी नाफेड आणि एनसीसीएफ यांनी एक वेब पोर्टल सुरू केले आहे. ज्यावर तूरडाळ उत्पादक शेतकऱ्यांनी नोंदणी करू शकतात. किमान आधारभूत किमतीवर तूरडाळ ऑनलाईन विकू शकतात. शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादनाचे पैसे थेट त्यांच्या बँक खात्यात डीबीटीद्वारे दिले जातील.

सरकारी एजन्सी नाफेड आणि एनसीसीएफ यांनी एक वेब पोर्टल सुरू केले आहे. याचे उद्घाटन गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांनी केले. हरभरा आणि मूग सोडून इतर कडधान्यांच्या उत्पादनात भारत स्वावलंबी नाही. उर्वरित कडधान्यांसाठी भारत आयातीवर अवलंबून आहे. कडधान्ये आयात करणे हे भारतासाठी अजिबात चांगली गोष्ट नसल्याचे शहा म्हणाले. भारत डिसेंबर २०२७ पूर्वी कडधान्यांच्या क्षेत्रात स्वावलंबी होईल आणि जानेवारी २०२८ पासून भारत एक किलोही कडधान्य आयात करणार नसल्याचे शहा म्हणाले. वेब पोर्टल लाँच करताना अमित शहा म्हणाले की, शेतकऱ्यांना कडधान्यांची लागवड करण्यापूर्वी नाफेड आणि एनसीसीएफच्या वेब पोर्टलवर नोंदणी करावी लागेल. पिकाच्या उत्पादनानंतर, शेतकरी त्यांची तूरडाळ एमएसपीवर ऑनलाईन पोर्टलवर विकू शकतात. शेतकऱ्यांना थेट लाभ हस्तांतरणाद्वारे त्यांच्या डाळीचे पैसे दिले जातील. जर डाळींची किंमत एमएसपीपेक्षा जास्त असेल तर सरकार जास्त किंमत देण्याचे सूत्र तयार करेल.

गृह व सहकार मंत्री अमित शहा म्हणाले की, शेतकरी त्यांच्या मालाला भाव मिळत नसल्याने कडधान्य पेरणी टाळत आहेत. शेतकऱ्यांनी कडधान्यांचे उत्पादन केल्यानंतरही त्यांनी आपला माल जिथे जास्त भाव मिळतो त्या बाजारात विकला तरी वेब पोर्टलवर निश्चितपणे नोंदणी करावी, असे त्यांनी सांगितले. परंतु किमान किंमत हमीभावापेक्षा कमी असल्यास नाफेड आणि एनसीसीएफ निश्चितपणे त्यांच्या उत्पादनाची खरेदी करतील ही सरकारची हमी आहे. सरकार देशाला वाटाणा, उडीद आणि मसूर यांच्या उत्पादनात स्वावलंबी बनवण्याचा प्रयत्न करत असल्याचे शहा म्हणाले.

कडधान्ये स्वस्त होतील

अमित शहा म्हणाले की, या वेब पोर्टलच्या शुभारंभामुळे आणि भारत डाळींच्या उत्पादनात स्वावलंबी झाल्यामुळं देशातील सर्वसामान्य नागरिकांना दिलासा मिळेल. कारण नागरिकांना स्वस्त दरात डाळ मिळू शकेल, असे गृहमंत्री अमित शहा म्हणाले.

logo
marathi.freepressjournal.in