नवी दिल्ली : आतापर्यंत विविध स्पर्धा परीक्षांसाठी सामायिक पात्रता परीक्षा (सीईटी) घेण्यात येत होती. आता केंद्र सरकारची नोकरी हवी असल्यास ‘सीईटी’ परीक्षा द्यावी लागणार आहे. या परीक्षेद्वारे गट ‘ब’ व गट ‘क’ची पदे भरली जाणार आहेत.
ही सीईटी परीक्षा राष्ट्रीय भरती संस्थेमार्फत होणार आहे. मे-जून २०२४ पासून ही परीक्षा सुरू होऊ शकते. ही परीक्षा वर्षातून दोन वेळा होणार आहे. यात मिळालेले गुण तीन वर्षांसाठी वैध राहतील. ही परीक्षा ११७ जिल्ह्यांत १ हजारहून अधिक केंद्रांवर घेतली जाईल.
या सीईटीच्या गुणांवर केंद्र सरकारबरोबरच सार्वजनिक उद्योग, राज्य सरकार व खासगी क्षेत्रातील भरती होऊ शकते. सध्या केंद्रीय सरकारच्या विविध विभागांमध्ये विभागवार भरती होत असते. रेल्वे भरती रेल्वे रिक्रूटमेंट बोर्ड, बँकेतील भरतीसाठी आयबीपीएस परीक्षा घेते.
याबाबत तज्ज्ञांनी सांगितले की, या भरती प्रक्रियेमुळे कमीत कमी अवधीत पार पडेल. एक भरती व दुसऱ्या भरतीत कालावधी कमी असेल. केंद्र सरकारतर्फे २०२० मध्ये राष्ट्रीय भरती संस्थेची स्थापना केली होती.
परीक्षेचा अभ्यासक्रम, फीसाठी समिती
सीईटी परीक्षा अभ्यासक्रम व परीक्षेची फी ठरवण्यासाठी राष्ट्रीय भरती संस्थेने एक कमिटी स्थापन केली आहे. परीक्षेसंदर्भात विविध मुद्यांवर समितीचा अहवाल तयार झालेला आहे. या परीक्षेसाठी जाहीर केला जाऊ शकते. समितीने ही परीक्षा पदवी स्तरावरील सीईटीपासून सुरू करण्याची शिफारस केली आहे.