श्रीनगरमध्ये ५० वर्षांतील सर्वात कडाक्याची थंडी

सध्या देशाच्या बऱ्याच शहरांमध्ये थंड वातावरण असून श्रीनगरमध्ये शनिवारी गेल्या ५० वर्षांतील सर्वात कडाक्याची थंडी पडली.
श्रीनगरमध्ये ५० वर्षांतील सर्वात कडाक्याची थंडी
Published on

श्रीनगर : सध्या देशाच्या बऱ्याच शहरांमध्ये थंड वातावरण असून श्रीनगरमध्ये शनिवारी गेल्या ५० वर्षांतील सर्वात कडाक्याची थंडी पडली. शनिवारच्या रात्री श्रीनगरमध्ये उणे ८.५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. हवामान विभागाच्या माहितीनुसार, श्रीनगरमध्ये १९७४ मध्ये सर्वात कमी तापमानाची नोंद झाली होती. शुक्रवारी रात्री श्रीनगरमधील तापमान मायनस (उणे) ६.२ अंश सेल्सिअस तापमानावरून उणे ८.५ अंश सेल्सिअस इतके घसरले होते. १९७४मध्ये श्रीनगर येथे सर्वात कमी म्हणजेच उणे १०.३ अंश सेल्सिअस इतके तापमान नोंदवले गेले होते. तसेच १८९१नंतर श्रीनगरमध्ये सर्वात कमी तापमानाची तिसरी रात्र नोंदवली गेली.

हाडे गोठवणारी थंडी पडल्यामुळे श्रीनगरमधील जनजीवन विस्कळीत झाले आहे. गोठवणाऱ्या थंडीमुळे अनेक पाणवठे गोठले आहेत. त्याचबरोबर प्रसिद्ध दल सरोवराचा काही भाग आणि शहराच्या तसेच खोऱ्यातील अनेक भागांतील पाणीपुरवठा करणाऱ्या लाईन गोठल्या आहेत. त्यामुळे नागरिकांना पाण्याचा पुरवठा होत नाही. प्रशासनाकडून नागरिकांना आवश्यक सोयीसुविधा पुरवण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. त्यामुळेच जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांनी पुढील काही दिवसांतील आपले जम्मू येथील सर्व कार्यक्रम रद्द केले आहेत.

दिल्ली, हरयाणामध्ये पावसाचा अंदाज

भारतीय हवामान विभागाने उत्तर भारतातील कडाक्याच्या थंडीच्या पार्श्वभूमीवर पावसाचा इशारा दिला आहे. दिल्ली-एनसीआर, उत्तर प्रदेश, हरयाणा आणि पंजाबसह अनेक राज्यांमध्ये येत्या काही दिवसांत पाऊस पडणार आहे. पावसासोबतच कडाक्याची थंडीही वाढणार आहे. पावसासोबतच पुढील पाच ते सात दिवस थंडीची लाट येण्याची शक्यताही हवामान खात्याने व्यक्त केली आहे. रविवारी सकाळी दिल्लीत धुके आणि किमान तापमान ८ अंश सेल्सिअस नोंदवले गेले आहे.

logo
marathi.freepressjournal.in