काँग्रेस, इंडिया आघाडी मणिपूरचा प्रश्न संसदेत पूर्ण ताकदीनिशी मांडणार; राहुल गांधी यांनी केले स्पष्ट

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वत: मणिपूरला भेट द्यावी, तेथील जनतेच्या समस्या ऐकून घ्याव्यात आणि शांततेचे आवाहन करावे, या मागणीचाही राहुल गांधी यांनी पुनरुच्चार केला.
काँग्रेस, इंडिया आघाडी मणिपूरचा प्रश्न संसदेत पूर्ण ताकदीनिशी मांडणार; राहुल गांधी यांनी केले स्पष्ट
Published on

नवी दिल्ली : काँग्रेस पक्ष आणि इंडिया आघाडी संसदेत मणिपूरचा प्रश्न पूर्ण ताकदीनिशी मांडेल, असे लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी गुरुवारी येथे मणिपूरच्या दौऱ्यावरून परतल्यानंतर सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वत: मणिपूरला भेट द्यावी, तेथील जनतेच्या समस्या ऐकून घ्याव्यात आणि शांततेचे आवाहन करावे, या मागणीचाही राहुल गांधी यांनी पुनरुच्चार केला.

राहुल गांधी सोमवारी मणिपूरच्या दौऱ्यावर गेले होते, तेथे त्यांनी जनतेशी संवाद साधला. त्याची छायाचित्रे 'एक्स'वर पोस्ट केल्यानंतर ते बोलत होते. मणिपूरमध्ये हिंसाचाराचा उद्रेक झाल्यापासून आपण तेथे तीनदा भेट दिली. परंतु, दुर्दैवाने तेथील स्थितीत सुधारणा झालेली नाही. अद्यापही राज्य दोन भागांमध्ये विभागलेले आहे. घरे जळत आहेत, निष्पाप लोकांचे जीवन धोक्यात आले आहे आणि हजारो जणांना जबरदस्तीने मदत छावण्यांमध्ये आश्रय घ्यावा लागला आहे, असेही गांधी यांनी म्हटले आहे.

या पार्श्वभूमीवर नरेंद्र मोदी यांनी मणिपूरचा दौरा करावयास हवा, तेथील जनतेच्या समस्या ऐकून घ्यावयास हव्यात आणि शांततेचे आवाहन करावयास हवे, असे विरोधी पक्षनेते म्हणाले. मणिपूरमधील संघर्षावर तोडगा काढण्यासाठी सरकारवर दबाव टाकावा म्हणून काँग्रेस आणि इंडिया आघाडी संसदेत मणिपूरचा प्रश्न पूर्ण ताकदीनिशी मांडेल, असेही गांधी म्हणाले.

logo
marathi.freepressjournal.in