लोकसभा निवडणुकीसाठी 'इंडिया' आघाडीच्या जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरला, काँग्रेसला मिळाल्या 'इतक्या' जागा

उत्तर प्रदेश काँग्रेसचे प्रभारी अविनाश पांडे यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर जागा वाटपाबाबत माहिती दिलीय.
Avinash Pande
Avinash Pande

loksabha Election Latest News : आगामी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांनी मोर्चेबांधणी सुरु केलीय. काही पक्षांमध्ये जागावाटपाचा तिढा असतानाच उत्तरप्रदेशमध्ये इंडिया आघाडीच्या जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरला आहे. काँग्रेस उत्तरप्रदेशात १७ जागांवर निवडणूका लढवणार असून इंडिया आघाडीचे उमेदवार उर्वरीत ६३ जागांवर असणार आहेत. उत्तर प्रदेश काँग्रेसचे प्रभारी अविनाश पांडे यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर याबाबत माहिती दिलीय.

पांडे यांनी एक्सवर म्हटलंय की, "मला तुम्हाला सांगण्यास आनंद होतोय की, उत्तर प्रदेशात काँग्रेस १७ जागांवर निवडणूक लढवणार आहे, तर इंडिया आघाडीचे उर्वरीत ६३ जागांवर सपा आणि इतर पक्षांचे इंडिया आघाडीचे उमेदवार असणार आहेत."

गेल्या काही दिवसांपासून लोकसभेच्या जागा वाटपावरुन अनेक पक्षांमध्ये गोंधळ उडाला आहे. परंतु, समाजवादी पक्ष आणि काँग्रेस यांच्यात असलेला जागा वाटपाचा प्रश्न सुटला आहे. मध्य प्रदेशमध्ये सपाला एक जागा देण्याचा ठराव दोन्ही पक्षांच्या वतीने मंजूर करण्यात आला. समाजवादी पक्षाचा उमेदवार मध्य प्रदेशातील खजुराहो येथील जागेवर निवडणूक लढवणार आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मागच्या वेळी उत्तर प्रदेशच्या वाराणसीतून लोकसभा निवडणूक लढवली होती. या जागा वाटपात वाराणसीचाही समावेश आहे. त्यामुळे मोदी जर वाराणसीतून पुन्हा उभे राहिले तर त्यांच्याविरोधात काँग्रेसची रणनीती काय असेल आणि कोणता उमेदवार उभा राहिल, हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. काँग्रेसला वाराणसी, अमेठी, रायबरेली, महाराजगंज, देवरिया, बांसगाव, प्रयागराज, सीतापूर, अमरोहा, बुलंदशहर, गाजियाबाद, कानपूर, झांसी, बाराबंकी, फतेहपूर, सीकरी, सहारनपूर, आणि मथुरा या जागा मिळाल्या असून काँग्रेस या ठिकाणी उमेदवार उभे करणार आहे.

logo
marathi.freepressjournal.in