नवी दिल्ली : केंद्र सरकारच्या 'अग्निपथ' लष्कर भरती योजनेवर सोमवारी काँग्रेसने जोरदार हल्ला चढविला. या योजनेमुळे युवकांवर मोठा अन्याय होत असून केंद्रात सत्तेवर आल्यास 'अग्निपथ' योजना रद्द करून पुन्हा जुन्या पद्धतीची भरती योजना सुरू केली जाईल, असे काँग्रेसने स्पष्ट केले. जवळपास दोन लाख उमेदवारांनी भरती प्रक्रिया पूर्ण केली आहे, मात्र त्यांना अद्यापही सेवेत रुजू होण्याबाबत पत्रे देण्यात आलेली नाही, त्यामुळे त्यांना पत्रे द्यावी, कारण 'अग्निपथ' योजना २०२२ मध्ये सुरू करण्यात आली आहे, असे विरोधी पक्षाने म्हटले आहे.
काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी या बाबत राष़्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना सोमवारी एक पत्र पाठविले आहे. ज्या युवकांना सशस्त्र दलात नियमितपणे भरती होण्याची इच्छा आहे त्यांच्यावर 'अग्निपथ' योजनेमुळे मोठा अन्याय होत आहे, त्यामुळे या युवकांना मुर्मू यांनी न्याय द्यावा, असे खरगे यांनी पत्रामध्ये म्हटले आहे. सशस्त्र दलात नियिमत भरती करण्याची प्रक्रिया रद्द केल्याने जवळपास दोन लाख युवक-युवतींचे भवितव्य अनिश्चिततेच्या भोवऱ्यात सापडले आहे, असेही खरगे यांनी म्हटले आहे. 'अग्निपथ' योजनेशी निगडीत अनेक प्रश्न आहेत, 'अग्निपथ' योजनेमुळे लष्कराला आश्चऱ्याचा धक्का बसल्याचे माजी लष्करप्रमुख मनोज नरवणे यांनी लिहिले होते, नौदल आणि हवाई दलासाठी हे पूर्ण अनपेक्षित होते, असे खरगे यांनी पत्रामध्ये म्हटले आहे. समांतर श्रेणी निर्माण करून त्यांच्याकडे तेच काम सोपविणे, त्यांचे मानधन, लाभ आणि भवितव्य यामध्ये भिन्नता असणे हे जवांनांमध्ये भेदभाव करणारे आहे, असेही खरगे यांनी म्हटले आहे.