हैदराबाद : नॅशनल हेरॉल्ड वृत्तपत्राची मालमत्ता जप्त केल्याने काँग्रेस घाबरेल, असे त्यांना वाटत असेल तर ते चुकीचे आहे, काँग्रेस कधीही घाबरणार नाही आणि शेवटपर्यंत लढेल, असे काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी बुधवारी तेलंगणातील आलमपूर येथील निवडणूक प्रचारसभेत बोलताना सांगितले.
खर्गे यांनी ईडीच्या कारवाईवर पंतप्रधान मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावर जोरदार निशाणा साधला. ते म्हणाले की, त्यांनी पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी सुरू केलेले वृत्तपत्र बंद करण्याचा विचार केला. मला आज वाईट वाटते. माझ्या पक्षाचा पेपर, जो पंडित जवाहरलाल नेहरूंनी सुरू केला होता, तो नॅशनल हेरॉल्ड. आमचे तीन पेपर होते. मोदींनी काल काँग्रेसची संपत्ती जप्त केली. ती मालमत्ता कोणा एका व्यक्तीची नव्हती. पंडित नेहरूंनी जो पेपर सुरू केला, तो स्वातंत्र्यलढ्यासाठी आणि लोकांमध्ये जागरुकता निर्माण करण्यासाठी. तो स्वातंत्र्यसैनिकांचा आवाज बनला होता, असे सांगत खर्गे म्हणाले की, जर नेहरूंनी सुरू केलेले वृत्तपत्र बंद द झाले तर तेलंगणातील लोक घाबरतील व भाजप व केसीआरला मते देतील, असे त्यांना वाटत आहे.