
देशातील अनेक राज्यांमध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस पडून पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. यात अनेक ठिकाणी दरडी कोसळणं, रस्ते खचणं, पुल वाहून जाणं. अशा घटना घडल्या आहेत. आता देशातील सुमारे १२ राज्यांमध्ये जोरदार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. यात विशेषकरुन आंध्रप्रदेश, तेलंगणा आणि ओडिशातील काही भागात अतिमुसळधार पाऊस पडण्याचा इशारा देण्यात आला आहे. हवामान खात्याने पुढील तीन दिवसात लोकांना घराबाहेर न पडण्याचा इशारा दिला आहे. तर उत्तर भारतातील डोंगराळ भागांमध्ये देखील पुढील आठवढ्याभरात अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. यासोबतचं उत्तर प्रदेशात येणाऱ्या काही दिवसात पुराचा फटका बसण्याची शक्यता आहे.
बंगालच्या उपसागरामध्ये नवीन चक्रीवादळसदृश्य स्थिती निर्माण झाली आहे. बंगालच्या खाडीत पश्चिम, मध्य आणि नैऋत्येला ही स्थिती निर्माण झाली आहे. हे वादळ सुमद्राच्या पाणीपातळीपासून ५.८ ते ७.६ किलोमीटरवर आहे. येत्या २४ तासात या स्थितीचे रुपांतर कमी दाबाच्या पट्ट्यात होण्याची शक्यता आहे. पश्चिम बंगालमधील या परिस्थितीमुळे तेलंगणा, कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र, गुजरात आणि कर्नाटकच्या समुद्रकिनाऱ्यालगत मोठ्या प्रमाणावर पावसाची शक्यता वर्तवली आहे.
हिमाचल प्रदेश, राजस्थानचा पूर्वेकडील भाग, पश्चिम मध्य प्रदेश, विदर्भ, छत्तीसगड, अंदमान-निकोबार, मराठवाडा,आंध्रप्रदेशची किनारपट्टी, अरुणाचल प्रदेश, ओडिशा, आसाम, तेलंगाणा, मेघालय, कर्नाटक, केरळ, तामिळनाडू आणि पॉण्डेचेरीत मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.