गेल्या काही महिन्यांमध्ये रस्ते अपघातांची संख्या जास्तच वाढताना दिसत आहे. या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून कारमध्ये सहा एअरबॅग लावण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र ती निर्णय आता लांबणीवर पडला आहे. पुढील वर्षापासून या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात येणार असल्याची घोषणा केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी केली. सरकारने घेतलेल्या या निर्णयामुळे वाहन उद्योगाला मोठा दिलासा मिळाला आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आठ आसनी कारमध्ये सहा एअरबॅग अनिवार्य करण्याचा निर्णय घेतला होता. प्रवाशांची सुरक्षितता लक्षात घेऊन हा निर्णय लागू करण्यात आला. हा निर्णय 1 ऑक्टोबर 2022 पासून लागू होणार होता.
कोणत्या कारणामुळे निर्णय पुढे ?
वाहन उद्योग सध्या मागणी-पुरवठा साखळीतील आव्हानांना तोंड देत आहे. या समस्यांचा परिणाम वाहन उद्योगावर होत आहे. हे लक्षात घेऊन पुढील वर्षापासून वाहनांच्या M1 श्रेणीत सहा एअरबॅग्ज लागू करण्यात येणार आहेत.
गाड्यांच्या किमतींमध्ये होऊ शकते वाढ ?
कारमधील एअरबॅगची संख्या वाढल्याने कारच्या किमतीवर परिणाम होण्याची शक्यता आहे. सहा एअरबॅगसह कार आल्यास कारची किंमत 30 ते 40 हजारांनी वाढू शकते.