

नवी दिल्ली : शाहदरा परिसरातील विवेक विहार भागात रविवारी पहाटे चार मजली निवासी इमारतीला लागलेल्या भीषण आगीत आतापर्यंत नऊ जणांचा होरपळून मृत्यू झाला असून, चार जण गंभीर जखमी झाले आहेत. एसीचा स्फोट झाल्याने किंवा शॉर्टसर्किट झाल्याने ही आग लागली असावी असा प्राथमिक अंदाज आहे.
पहाटे ३ वाजून ४७ मिनिटांच्या सुमारास या इमारतीला आग लागल्याची माहिती अग्निशमन दलाला मिळाली. आग इतकी भीषण होती की, काही वेळातच आगीने इमारतीचा दुसरा, तिसरा आणि चौथा मजला आपल्या कचाट्यात घेतला. गाढ झोपेत असलेल्या रहिवाशांना बाहेर पडण्याची संधीच मिळाली नाही. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या १२ गाड्या तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या आणि बचावकार्य सुरू केले.
काही लोक दरवाजाचे कुलूप उघडू शकले नाहीत, त्यामुळे त्यांचा मृत्यू झाला. काही जण वाईट अवस्थेत जळाल्यामुळे त्यांच्या मृतदेहांची ओळख डीएनए चाचणीने केली जाईल. पोलिसांनी ओळख पटवण्यासाठी मृतदेहांचे फोटो घेतले आहेत.
या घटनेमुळे निवासी इमारतींमधील अग्निशमन सुरक्षा व्यवस्थेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. ऐन पहाटे घडलेल्या या दुर्घटनेने अनेक कुटुंबांचा आधार हिरावून घेतला असून दिल्लीत हळहळ व्यक्त केली जात आहे.