

नवी दिल्ली : दिल्ली विद्यापीठाच्या साऊथ कॅम्पसजवळील ‘सत्यनिकेतन’ या दाटीवाटीच्या भागात रविवारी दुपारी मुलांच्या वसतिगृहाची पाच मजली इमारत कोसळून तीन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला आहे. पाच जणांची प्रकृती गंभीर असून अनेक जण अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. या घटनेच्या वेळी इमारतीत ३० ते ५० लोक असावेत, असा दावा स्थानिकांनी केला आहे. मात्र, प्रशासनाने अडकलेल्यांच्या संख्येबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही.
मलब्यातून आतापर्यंत आठ जणांना बाहेर काढले असून, त्यापैकी दोघांना रुग्णालयात मृत घोषित करण्यात आले, तर तिसऱ्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. पाच जणांची प्रकृती गंभीर असल्याचे पोलिसांनी सांगितले.
पेइंग गेस्टसाठी वापरल्या जाणाऱ्या या पाच मजली इमारतीचा कोसळण्याचा अपघात दुपारी १:३० वाजताच्या सुमारास घडला. त्यावेळी इमारतीच्या तळघरात दुरुस्तीचे काम सुरू होते, असे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.
इमारत कोसळल्यामुळे अनेक वाहनेही मलब्याखाली दबली गेली. एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, ही इमारत सुमारे ५० वर्षे जुनी होती. एनडीआरएफच्या दोन तुकड्या, ज्यामध्ये ७० जवान आणि श्वानपथकाचा समावेश आहे, बचावकार्यासाठी तैनात करण्यात आल्या आहेत. अडकलेल्या लोकांना श्वास घेता यावा यासाठी मलब्याखाली ऑक्सिजन सिलिंडर पोहोचवण्यात आले आहेत, असे एनडीआरएफच्या अधिकाऱ्याने सांगितले. अग्निशामक दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत.
या घटनेची माहिती मिळताच दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता, उपराज्यपाल तरणजित सिंग संधू, पोलिस आयुक्त अनुराग कुमार आणि खासदार बांसुरी स्वराज यांनी घटनास्थळी धाव घेतली. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी या अपघातातील जीवितहानीबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले.
त्यांनी मुख्यमंत्र्यांशी, पोलिस आयुक्तांशी आणि एनडीएमए महासंचालकांशी बोलून जमिनीवरील परिस्थितीचा आढावा घेतल्याचे सांगितले.