व्हिलचेअर न मिळाल्याने मृत्यू; एअर इंडियाला ३० लाखांचा दंड

मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर एका वृद्धाचा इमिग्रेशन काऊंटरजवळ मृत्यू झाला होता.
व्हिलचेअर न मिळाल्याने मृत्यू; एअर इंडियाला ३० लाखांचा दंड

मुंबई : मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर एका वृद्धाचा इमिग्रेशन काऊंटरजवळ मृत्यू झाला होता. या प्रवाशाने एअर इंडियाच्या विमानात व्हिलचेअर बुक केली होती. परंतु त्यांना व्हिलचेअर मिळाली नसल्याने त्यांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाकडून एअर इंडियाला ३० लाखांचा दंड ठोठावण्यात आला आहे.

१६ फेब्रुवारी रोजी एका प्रवाशाने पत्नीसोबत न्यूयॉर्क येथून एअर इंडियाच्या विमानात व्हिलचेअर बुक केली होती. न्यूयॉर्कहून तो प्रवासी मुंबईत आला होता. ११.३० वाजता येणारे हे विमान दुपारी २.३० वाजता उतरले. या विमानातील ३२ प्रवाशांना व्हिलचेअरची गरज होती, मात्र एअर इंडिया केवळ १५ व्हिलचेअर उपलब्ध करू शकली होती.

विमानतळावर व्हिलचेअर नसल्यामुळे त्यांना एकच व्हिलचेअर असिस्टंट मिळाला. वृद्ध व्यक्तीने आपल्या पत्नीला त्या व्हिलचेअरवर बसवले आणि पायी चालायचे ठरवले. वृद्ध व्यक्ती सुमारे १.५ किमी चालल्यानंतर इमिग्रेशन क्षेत्रात पोहोचली आणि हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाले. मनुभाई पटेल असे मृत्य झालेल्या व्यक्तीचे नाव होते. मृत ज्येष्ठ नागरिक हे अनिवासी भारतीय आणि अमेरिकेचे पासपोर्टधारक होते. दरम्यान, व्हिलचेअरच्या अधिक मागणीमुळे प्रवाशाला व्हिलचेअर असिस्टंट मिळेपर्यंत वाट पाहण्याची विनंती केली होती. मात्र त्यांनी पत्नीसोबत चालण्याचा पर्याय निवडला, असे एअर इंडियाने म्हटले आहे. याप्रकरणी सहार पोलीस ठाण्याने या प्रकरणी अपघाती मृत्यूची नोंद (एडीआर) केली होती. नियमानुसार गरज पडेल तितक्या व्हिलचेअर उपलब्ध करणे ही विमान कंपनीची जबाबदारी आहे. मात्र या नियमाचे उल्लंघन केल्याचा ठपका आता एअर इंडियावर ठेवला आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in