
नवी दिल्ली : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि जेपी नड्डा यांनी बुधवारी दिल्लीत एनडीएमधील नेत्यांची बैठक घेतली. यावेळी त्यांनी काँग्रेसकडून उपस्थित होत असलेल्या संविधानाच्या मुद्द्यावर नेत्यांशी सविस्तर चर्चा केली. काँग्रेसने डॉ. बाबासाहेब आंबेडकर अथवा मांडलेल्या इतर मुद्द्यांमध्ये अडकू नका, तर सकारात्मक काम करा, असे अमित शहा म्हणाले. काँग्रेस आणि त्यांच्या सरकारांनी कशाप्रकारे संविधानाचे उल्लंघन केले आहे, हेही या बैठकीत सांगण्यात आले. या बैठकीत एनडीएमध्ये समन्वयावर चर्चा झाली. कॅबिनेट मंत्री आणि राज्यमंत्री विविध खासदारांशी समन्वय साधून त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी किंवा आवश्यक ते सहकार्य कसे करतील यावरही चर्चा झाली.
एनडीएतील नेत्यांसोबत चर्चेदरम्यान अमित शहा आंबेडकरांच्या मुद्द्यावर म्हणाले की, राज्यसभेतील त्यांच्या भाषणानंतर तीन तासांनी काँग्रेसने बैठक घेतली होती. मग निवेदन संपादित करून पसरवले गेले. यासाठी टूलकिटचाही वापर करण्यात आला. आंबेडकर किंवा काँग्रेसने उपस्थित केलेल्या अन्य मुद्द्यांमध्ये अडकू नका, तर सकारात्मक काम करा, असे गृहमंत्री म्हणाले. सरकारची धोरणे आणा आणि काम करा. राज्यघटना लागू करण्यात काँग्रेसने कुठे चुका केल्या, हे शहा यांनी यावेळी सांगितले.
काँग्रेस सरकारने आणीबाणी लागू केली, पण राष्ट्रपतींची स्वाक्षरीही घेतली नाही, असे शहा म्हणाले. एनडीएमध्ये उत्तम समन्वयावर चर्चा झाली. यासोबतच संविधान दिनानिमित्त संसदेच्या दोन्ही सभागृहात झालेली चर्चा सार्थ ठरल्याचे सांगण्यात आले. शिवसेनेचे नेते आणि केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव बैठकीला उपस्थित होते. त्यांनी या बैठकीत शिवसेनेचे प्रतिनिधीत्व केले.
राष्ट्रवादी अनुपस्थित
नड्डा यांच्या निवासस्थानी झालेल्या एनडीएच्या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा एकही नेता हजर नव्हता. उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार सध्या मुंबईत तर प्रदेशाध्यक्ष सुनीत तटकरे प्रस्तावित कामांमुळे त्यांच्या लोकसभा मतदारसंघात होते. कार्यकारी अध्यक्ष प्रफुल पटेल परदेशी गेलेले आहेत. एनडीए किंवा दिल्लीतील महत्त्वाच्या बैठकांना अजित पवारांसोबत हे दोनच नेते असतात.
अजित पवार अनुपस्थित असल्यास या दोनपैकी एका नेत्याची उपस्थिती असते. पण आजच्या बैठकीला तटकरे आणि पटेल अनुपस्थित आहेत. त्यांची अनुपस्थिती चर्चेचे कारण ठरले आहे.