

नवी दिल्ली : देशाच्या ८० व्या स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी देशवासीयांना संबोधित केले. आपल्या भाषणात त्यांनी विद्यार्थी हे "भारताच्या भविष्याचे शिल्पकार" असल्याचे सांगत, स्पर्धा परीक्षांमधील गैरप्रकार आणि पेपर फुटीची प्रकरणे पूर्णपणे रोखण्यासाठी सरकार व्यापक आणि ठोस पावले उचलत असल्याची ग्वाही दिली.
सार्वजनिक परीक्षा या विद्यार्थ्यांसाठी संधींची द्वारे असतात. त्यामुळेच संपूर्ण परीक्षा यंत्रणा अधिक पारदर्शक, सुरक्षित आणि विश्वासार्ह बनवण्यावर सरकारचा भर आहे. अलीकडच्या काळात झालेल्या विद्यार्थी आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रपतींचे हे विधान अत्यंत महत्त्वाचे मानले जात आहे.
देशातील ६५ टक्के जनता ३५ वर्षांपेक्षा कमी वयाची आहे. आजचा तरुण 'नोकरी मागणारा' नसून 'नोकरी देणारा' बनत आहे. तरुणांच्या मेहनतीमुळे आणि नाविन्यपूर्ण संकल्पनांमुळे देशात एक मजबूत 'स्टार्टअप इकोसिस्टम' तयार झाली आहे. 'खेलो इंडिया' कार्यक्रमाद्वारे तळागाळापासून राष्ट्रीय पातळीपर्यंत क्रीडा क्षेत्रात अभूतपूर्व गुंतवणूक केली जात आहे. नुकत्याच ग्लासगो येथे पार पडलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारताने मिळवलेल्या १३ सुवर्णपदकांपैकी ८ सुवर्णपदके महिला खेळाडूंनी जिंकल्याचा विशेष उल्लेख राष्ट्रपतींनी केला.