भारत-मालदीव तणाव वाढला : 'या' कंपनीचा मोठा निर्णय, रद्द केले मालदीवचे सर्व बुकिंग

मोदींच्या लक्षद्वीप दौऱ्यानंतर मालदीवच्या नेत्यांनी भारत आणि पंतप्रधानांवर असभ्य भाषेत प्रितिक्रिया दिली होती. यानंतर बॉलिवूड सेलिब्रिटींपासून ते सर्वसामान्यांपर्यंत सोशल मीडियावर मालदीव सरकारवर टीका केली. यासोबतच 'बॉयकॉट मालदीव' आणि 'लेट्स लक्षद्वीप' सोशल मीडियावर ट्रेंड करत आहेत.
भारत-मालदीव तणाव वाढला :  'या' कंपनीचा मोठा निर्णय, रद्द केले मालदीवचे सर्व बुकिंग

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लक्षद्वीपचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर करत भारतीयांना येथे भेट देण्याचे आवाहन केल्यानंतर मालदीवच्या काही मंत्र्यांनी भारतासह मोदींबाबत अवमानकारक पोस्ट केल्या होत्या. यामुळे भारत-मालदीवमध्ये तणाव निर्माण झाला असून भारतात #BoycottMaldives मोठ्या प्रमाणावर ट्रेंड होत आहे. अनेक भारतीय मालदीवला जाण्याचा बेत रद्द केल्याचे सांगत आहेत. मालदीवच्या पर्यटनाला हा मोठा फटका मानला जात आहे. अशात 'इज माय ट्रिप' या ट्रॅव्हल कंपनीने मालदीवसाठीचे सर्व विमान बुकिंग रद्द केल्याची घोषणा सोमवारी केली.

यापुढे मालदीवचे बुकींग स्वीकारणार नाही-

'इज माय ट्रिप'चे सीईओ आणि सह-संस्थापक प्रशांत पित्ती यांनी याबाबत माहिती दिली आहे. "सध्या सोशल मीडियावर सध्या जे सुरु आहे. आम्हाला जे ऐकायला मिळतय. मालदीवच्या मंत्र्यांनी जे वक्तव्य केले आहे. त्यावरुन आम्ही यापुढे मालदीवच्या कोणत्याही बुकींग स्वीकारणार नाहीत. आपल्या देशातून तीन लाख लोक दरवर्षी मालदीवला जातात. आता त्यांना 'इज माय ट्रीप'वर ही सेवा मिळणार नाही. पंतप्रधान मोदींनी मालदिवपेक्षाही चांगली ठिकाणे आपल्याकडे असल्याचे दाखवून दिले. त्यांनी लक्षद्वीपसारख्या चांगल्या स्थळाचे व्हिडिओ-फोटो दाखवले. आम्ही स्वतःही यापूर्वी लक्षद्वीपला गेलो आहेत आणि परत जाणार आहोत. मी इतर विमान कंपन्यांनाही थेट दिल्ली, मुंबई, बंगळूर येथून लक्षद्वीपसाठी कनेक्टिव्हिटी वाढवायला सांगत आहोत", असे पित्ती म्हणाले.

...म्हणून घेतला हा निर्णय

"आम्ही 'इज माय ट्रिप'वर लक्षद्वीपच्या प्रचारासाठी पाच नवीन पॅकेज आणले आहेत. तसेच, आम्ही अयोध्याचा देखील प्रचार करत आहोत. आम्हाला वाटते आपल्या देशातील अयोध्या, लक्षद्वीप हे आंतरराष्ट्रीय पर्यटनस्थळे व्हावी, याठिकाणी देशभरातून पर्यटकांनी यावे. याद्वारे देशातील पर्यटन व्यवसायात वाढ व्हावी, यासाठी आम्ही हा निर्णय घेतला", असे त्यांनी सांगितले. तसेच, इतर कंपन्यांनीही या मोहिमेत सहभागी व्हावे, आपण व्यवसायाआधी देशाचा विचार करायला हवा, यासाठी आम्ही ही मोहिम सुरु केली आहे," असे पित्ती यांनी एक व्हिडिओ जारी करत म्हटले .

दरम्यान, मोदींच्या लक्षद्वीप दौऱ्यानंतर मालदीवच्या नेत्यांनी भारत आणि पंतप्रधानांवर असभ्य भाषेत प्रितिक्रिया दिली होती. यानंतर बॉलिवूड सेलिब्रिटींपासून ते सर्वसामान्यांपर्यंत सोशल मीडियावर मालदीव सरकारवर टीका केली. यासोबतच 'बॉयकॉट मालदीव' आणि 'लेट्स लक्षद्वीप' सोशल मीडियावर ट्रेंड करत आहेत.

logo
marathi.freepressjournal.in