राहुल गांधी यांना निवडणूक आयोगाची ताकीद

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना उद्देशून जाहीर सभेत 'पनौती’, 'खिसेकापू' यांसारखे अपशब्द वापरणाऱ्या काँग्रेस नेते राहुल गांधी यांना बुधवारी निवडणूक आयोगाने जिभेवर ताबा ठेवण्याची ताकीद दिली
राहुल गांधी यांना निवडणूक आयोगाची ताकीद
(संग्रहित छायाचित्र)

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना उद्देशून जाहीर सभेत 'पनौती’, 'खिसेकापू' यांसारखे अपशब्द वापरणाऱ्या काँग्रेस नेते राहुल गांधी यांना बुधवारी निवडणूक आयोगाने जिभेवर ताबा ठेवण्याची ताकीद दिली आहे. सार्वजनिक ठिकाणी जाहीर वक्तव्ये करताना अधिक सावधगिरी बाळगावी, असा इशारा राहुल यांना देण्यात आला आहे.

राहुल गांधी यांनी नोव्हेंबर २०२३ मध्ये केलेल्या निवडणूक प्रचाराच्या भाषणात मोदी यांना उद्देशून 'पनौती’ आणि 'खिसेकापू' हे शब्द वापरले होते. मोदी हे देशासाठी 'पनौती’ आहेत. त्यांच्यामुळे चांगल्या कामात अपशकुन होतो. तसेच मोदी 'खिसेकापू'सारखे काम करतात. मोदी लोकांचे लक्ष अन्यत्र वळवतात आणि त्यावेळी उद्योगपती गौतम अदाणी लोकांचा खिसा कापतात, असे विधान राहुल यांनी केले होते. त्यावरून देशात बरेच वादंग माजले होते. राहुल यांच्या वक्तव्यांमुळे निवडणूक आचारसंहितेचा भंग झाल्याचा आरोप करण्यात आला होता.

त्यावेळी दाखल झालेल्या तक्रारींची दखल घेत दिल्ली उच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाला राहुल यांना नोटीस देण्यास सांगितले होते. त्यानुसार निवडणूक आयोगाने राहुल यांना नोटीस बजावली असून सार्वजनिक जीवनात जाहीर वक्तव्ये करताना काळजी घेण्यास फर्मावले आहे.

logo
marathi.freepressjournal.in