

कोलकाता : पश्चिम बंगालमध्ये स्वतंत्र, निष्पक्ष आणि शांततापूर्ण निवडणुका सुनिश्चित करणे ही निवडणूक आयोगाची प्राथमिकता आहे, कोणत्याही पात्र मतदाराचे नाव मतदार यादीतून वगळले जाणार नाही, असे मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार यांनी मंगळवारी येथे स्पष्ट केले.
राजकीय पक्ष आणि अधिकाऱ्यांसोबत अनेक बैठका घेतल्यानंतर कोलकाता येथे पत्रकार परिषदेत आयुक्त म्हणाले की, पश्चिम बंगालमधील लोक नेहमीच शांततापूर्ण आणि सहभागी लोकशाहीवर विश्वास ठेवत आले आहेत. बंगालमध्ये स्वतंत्र आणि निष्पक्ष निवडणुका तसेच शांततापूर्ण मतदान सुनिश्चित करणे हे आमचे ध्येय आहे.यापूर्वी, ज्ञानेश कुमार यांना सकाळी पुन्हा लोकांच्या विरोधाचा सामना करावा लागला. ज्ञानेश कुमार दक्षिणेश्वर काली मंदिरात गेले होते, जिथे जमावाने 'गो बॅक'च्या घोषणा दिल्या आणि काळे झेंडे दाखवले. मंगळवारी सलग तिसऱ्या दिवशी मुख्य निवडणूक आयुक्तांना लोकांच्या विरोधाचा सामना करावा लागला. यापूर्वी, कालीघाट मंदिरात दर्शन करून आणि रविवारी रात्री कोलकाता येथे पोहोचल्यावरही विमानतळाबाहेर लोकांनी त्यांना काळे झेंडे दाखवले होते.
एसआयआर वादावर लवाद स्थापन करण्याचे सुप्रीम कोर्टाचे आदेश
नवी दिल्ली : पश्चिम बंगालमध्ये एसआयआरदरम्यान मतदान यादीतून नावे वगळण्याविरुद्ध अपील ऐकण्यासाठी उच्च न्यायालयाच्या माजी न्यायाधीशांच्या नेतृत्वाखाली स्वतंत्र अपीलीय लवाद स्थापन करण्याचे आदेश मंगळवारी सर्वोच्च न्यायालयाने दिले.
एसआयआर प्रक्रियेत मतदान यादीतून नावे वगळण्याच्या दाव्यांशी आणि आक्षेपांबाबत व्यवहार करणाऱ्या न्यायिक अधिकारी यांच्या प्रामाणिकपणाबद्दल आक्षेप घेण्याविरुद्धच्या प्रयत्नांविरुद्धही सर्वोच्च न्यायालयाने कडक इशारा दिला.
अशा कृती म्हणजे न्यायव्यवस्थेचा अपमान असे वर्णन करत, सरन्यायाधीश सूर्य कांत यांच्या अध्यक्षतेखालील तीन न्यायाधीशांच्या पीठाने म्हटले आहे की, तुम्ही असे अर्ज का केले, यावरून तुमचा विश्वास नाही असे दिसून येते. कोणीही न्यायिक अधिकाऱ्यांना प्रश्न विचारण्याची हिंमत करू नये. भारताचे सरन्यायाधीश म्हणून, मी हे सहन करणार नाही.