आणीबाणी हा भारतीय इतिहासातील काळा कालखंड - पंतप्रधान नरेंद्र मोदी

त्या काळात देशात लोकशाही मार्गाने जाणाऱ्यांची छळवणूक झाली होती आणि असे गुन्हे देशाच्या स्वातंत्र्याला घातक
आणीबाणी हा भारतीय इतिहासातील काळा कालखंड - पंतप्रधान नरेंद्र मोदी

भारताच्या इतिहासात काँग्रेसने लादलेली आणीबाणी हा कालखंड काळा होता. तेव्हा लोकशाहीच्या पुरस्कर्त्यांचा छळ करण्यात आला होता, असा विषाद देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या मासिक ‘मन की बात’ कार्यक्रमात व्यक्त केला.

पंतप्रधान म्हणाले, ‘‘त्या काळात देशात लोकशाही मार्गाने जाणाऱ्यांची छळवणूक झाली होती आणि असे गुन्हे देशाच्या स्वातंत्र्याला घातक आहेत. मात्र, यामुळे पुढच्या पिढीला लोकशाहीच्या मूल्यांचे महत्त्व समजण्यास मदत होर्इल. पंतप्रधान म्हणाले की, ‘‘भारत ही लोकशाहीची माता आहे. आम्ही लोकशाही मूल्यांना सर्वोच्च आणि संविधानाला सर्वोत्तम समजतो. म्हणूनच आम्ही २५ जून हा दिवस कधीही विसरणार नाही. कारण याच दिवशी देशावर आणीबाणी लादली गेली होती आणि भारताच्या इतिहासातील तो काळा कालखंड होता.’’

मोदी म्हणाले, ‘‘देशातील लाखो लोकांनी सर्वशक्तीनिशी या आणीबाणीचा विरोध केला. तेव्हा लोकशाहीच्या समर्थकांचा इतका अमानुष छळ करण्यात आला होता की, आता त्याची आठवण झाली तरी अंगावर काटे उभे राहतात. या छळवणुकीवर आतापर्यंत अनेक पुस्तके लिहिली गेली आहेत. त्यात लोकशाही समर्थकांना देण्यात आलेल्या शिक्षा आणि त्यांच्यावर पोलीस आणि प्रशासनाने केलेल्या छळाच्या कथांचा उल्लेख आहे. आपण सुद्धा ‘संघर्ष में गुजरात’ नावाच्या पुस्तकातून या छळवणुकीला वाचा फोडण्याचा प्रयत्न केला आहे. काही दिवसांपूर्वीच मी आणखी एक पुस्तक पाहिले. त्याचे नाव होते ‘भारतातील राजकीय कैद्याचा छळ’. हे पुस्तक आणीबाणीच्या काळातच प्रकाशित झाले. त्याकाळी लोकशाहीच्या पुरस्कर्त्यांचा किती क्रूरपणे छळ झाला होता, हे सांगण्यात आले आहे. आज आपण आझादीचा अमृतमहोत्सव साजरा करीत आहोत. तेव्हा आपण लोकशाहीतील गुन्हेगारांवर देखील मागे वळून एक नजर टाकायला हवी. त्यामुळे तरुणार्इला लोकशाहीचे महत्त्व कळेल. १९७५ साली देशाचे पंतप्रधानपद इंदिरा गांधी यांच्याकडे होते, तेव्हा आणीबाणी लावण्यात आली होती, असे पंतप्रधान मोदी यांनी आपल्या मन की बात कार्यक्रमादरम्यान सांगितले.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in