

नवी दिल्ली : निवृत्ती निधी संस्था ईपीएफओचे सदस्य या वर्षी एप्रिलमध्ये लॉन्च होणाऱ्या तिच्या नव्याने तयार केलेल्या मोबाइल ॲप्लिकेशनद्वारे यूपीआय पेमेंट गेटवे वापरून त्यांचे कर्मचारी भविष्य निर्वाह निधी (ईपीएफ) थेट त्यांच्या बँक खात्यांमध्ये काढू शकतील, अशी माहिती एका उच्चपदस्थ सूत्राने दिली.
कामगार मंत्रालय एका प्रकल्पावर काम करत आहे, ज्यामध्ये ईपीएफची काही विशिष्ट रक्कम गोठवली जाईल आणि मोठा भाग युनिफाइड पेमेंट इंटरफेस (यूपीआय) वापरून त्यांच्या बँक खात्याद्वारे काढण्यासाठी उपलब्ध असेल, असे त्या सूत्राने पीटीआयला सांगितले.
त्या सूत्राने पुढे माहिती दिली की, कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना (ईपीएफओ) एक नवीन मोबाईल फोन ॲप्लिकेशन सुरू करणार आहे, ज्याद्वारे सदस्य यूपीआय गेटवे वापरून त्यांचे ईपीएफचे पैसे काढू शकतील, तसेच पासबुक बॅलन्ससारख्या इतर सेवांचा लाभ घेऊ शकतील.
सध्या, सदस्य त्यांच्या ईपीएफ खात्यांमध्ये प्रवेश करण्यासाठी आणि सेवांचा लाभ घेण्यासाठी युनिव्हर्सल अकाऊंट नंबर (यूएएन) पोर्टल किंवा उमंग ॲप वापरतात.
यूपीआय पिन वापराची परवानगी देऊन रक्कम हस्तांतरण होणार
सूत्राने सांगितले की, या दोन्ही प्लॅटफॉर्मवर या सेवा उपलब्ध राहतील, तर नवीन समर्पित ॲप ईपीएफओ सदस्यांसाठी सेवांची उपलब्धता आणि वितरण आणखी सुधारेल. त्यांनी स्पष्ट केले की, सदस्य मोबाइल ॲप्लिकेशनमध्ये त्यांच्या लिंक केलेल्या बँक खात्यांमध्ये हस्तांतरित करण्यासाठी उपलब्ध असलेली पात्र ईपीएफ शिल्लक पाहू शकतील. त्यांना व्यवहार पूर्ण करण्यासाठी त्यांचा लिंक केलेला यूपीआय पिन वापरण्याची परवानगी दिली जाईल, ज्यामुळे त्यांच्या बँक खात्यांमध्ये निधीचे सुरक्षित हस्तांतरण सुनिश्चित होईल.
ऑटो-सेटलमेंट मोड अंतर्गत, अर्ज दाखल केल्याच्या तीन दिवसांच्या आत कोणत्याही मानवी हस्तक्षेपाशिवाय पैसे काढण्याचे दावे इलेक्ट्रॉनिक पद्धतीने निकाली काढले जातात. या ऑटो-सेटलमेंट मोडची मर्यादा सध्याच्या १ लाख रुपयांवरून ५ लाख रुपयांपर्यंत वाढवण्यात आली आहे.
१०० डमी खाती वापरून चाचण्या सुरू
सूत्राने सांगितले की, ईपीएफओ सध्या सेवेची कार्यक्षमता सुधारण्यासाठी आणि सेवेतील कोणत्याही तांत्रिक त्रुटी दूर करण्यासाठी १०० डमी खाती वापरून चाचण्या घेत आहे. श्रम मंत्रालय या वर्षी एप्रिलमध्ये मोठ्या थाटामाटात नवीन ॲप लॉन्च करण्याची शक्यता आहे. सध्या, ईपीएफओ सदस्यांना त्यांचे ईपीएफचे पैसे काढण्यासाठी दाव्यासाठी अर्ज करावा लागतो, जी एक वेळखाऊ प्रक्रिया आहे.