
श्रीनगर: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार टीका करत काँग्रेसने, मोदी यांनी तिसऱ्यांदा शपथ घेतल्यानंतरही राज्यातील दहशतवाद वाढला असल्याचा आरोप केला. जम्मू आणि काश्मीरमधील दहशतवादाचा बीमोड करण्यात केंद्र सरकार अपयशी ठरले असून अनेक वर्षांपूर्वी थंड झालेल्या दहशतवादाने पुन्हा या प्रदेशात शिरकाव केला असल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे.
नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधानपदाची तिसऱ्यांदा शपथ घेतल्यानंतर ९८ दिवसांत जम्मू-काश्मीरमध्ये २५ दहशतवादी हल्ले झाल्याचे काँग्रेसच्या प्रवक्त्या सुप्रिया श्रीनात यांनी येथे एका पत्रकार परिषदेत सांगितले. दहशतवादाला पायबंद घालण्यात आल्याचे मोठे दावे करण्यात आले, मात्र मोदी यांनी तिसऱ्यांदा शपथ घेतल्यानंतर ९८ दिवसांत २५ दहशतवादी हल्ले झाले आणि त्यामध्ये २१ सुरक्षा कर्मचारी शहीद झाले, तर अन्य २८ जण जखमी झाले. त्याचप्रमाणे १५ नागरिक दहशतवादी हल्ल्यात मारले गेले आणि ४७ जण जखमी झाले, असेही त्या म्हणाल्या.