रायपूर : शेतकऱ्यांना कायदेशीर संरक्षण देणारा कडक कायदा केंद्र सरकार लवकरच आणणार असल्याची माहिती केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी शनिवारी येथे दिली. बोगस बी-बियाणे, विषारी खते आणि कीटकनाशके याद्वारे शेतकऱ्यांची होणारी पिळवणूक यापुढे सहन केली जाणार नाही, असे स्पष्ट करून त्यांनी शेतकऱ्यांच्या हिताला बाधा पोहोचविणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई करणार असल्याचे चौहान यांनी नमूद केले. कृषीमंत्री एक दिवसाच्या छत्तीसगड भेटीवर आले होते, तेव्हा त्यांनी दुर्ग जिल्ह्यातील दोन गावांमधील शेतकऱ्यांशी संवाद साधला. कोणत्याही स्थितीत शेतकऱ्यांची मेहनत, त्यांचे पीक आणि त्यांच्या भवितव्याशी कोणत्याही स्थितीत तडजोड केली जाणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.
ही प्रतारणा
बनावट बी-बियाणे, विषारी खते आणि कीटकनाशके याद्वारे शेतकऱ्यांचे नुकसान करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाईचा इशारा त्यांनी दिला. बनावट कृषीमालाचा पुरवाठा करणारे केवळ आर्थिक गुन्हेगारच नाहीत तर ते शेतकऱ्यांशी प्रतारणा करीत आहेत, असे चौहान म्हणाले.
या सर्व पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांसाठी सुरक्ष कवच म्हणून लवकरच संसदेत कडक कायदा केला जाणार आहे. शेतकऱ्यांचा सर्वंकष विकास आणि कल्याण याला केंद्र सरकारचे सर्वोच्च प्राधान्य आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.