
शंभू बॉर्डर (पटियाला) : पंजाबमधील १०१ आंदोलक शेतकरी रविवारी दुपारी शंभू सीमेवरून दिल्लीला जाण्यासाठी निघाले असता हरयाणा पोलिसांनी त्यांना रोखले. यावेळी पोलीस आणि शेतकरी यांच्यात झालेल्या वादावादीत ८ शेतकरी जखमी झाले. त्यामुळे हा मोर्चा स्थगित करण्यात आला आहे.
हरयाणा पोलिसांनी शेतकऱ्यांकडून दिल्लीला जाण्यासाठी परवानगीचे पत्र मागितले व परवानगीशिवाय दिल्लीला जाता येणार नाही, असे सांगितल्याने तणाव निर्माण झाला. त्यानंतर शेतकऱ्यांनी बॅरिकेड्स तोडण्याचा प्रयत्न केला असता पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या, पाण्याचा माराही करण्यात आला.
यावेळी ८ शेतकरी जखमी झाले असून, एकाची प्रकृती गंभीर आहे. त्याला चंदिगड पीजीआयमध्ये दाखल करण्यात आले आहे. यानंतर हा मोर्चा स्थगित करण्यात आला. आता बैठक घेऊन रणनीती बनवू, असे शेतकरी नेते पंढेर यांनी सांगितले.