
नवी दिल्ली : सुसंस्कृत समाजासाठी अभिव्यक्ती स्वातंत्र्य महत्त्वाचे आहे. स्वतःचे विचार आणि अभिव्यक्ती मुक्तपणे व्यक्त करणे हा निरोगी आणि सुसंस्कृत समाजाचा एक महत्त्वाचा भाग आहे. राज्यघटनेच्या कलम २१ अंतर्गत दिलेल्या सन्माननीय जीवन जगण्याच्या स्वातंत्र्याची कल्पना करणे शक्य नाही. कविता, नाटक, कला, व्यंग्य यांचा समावेश असलेले साहित्य आपले जीवन समृद्ध करते, असे महत्त्वपूर्ण निरीक्षण सुप्रीम कोर्टाने नोंदवले व काँग्रेस खासदार इम्रान प्रतापगढी यांच्याविरुद्ध दाखल केलेला एफआयआर रद्द केला.
सुप्रीम कोर्टाचे न्या. अभय ओक व न्या. उज्ज्वल भुयान यांच्या खंडपीठाने हा निकाल दिला. खासदार इम्रान प्रतापगढी यांनी त्यांच्या ‘इंस्टाग्राम’ हँडलवरून एक कविता शेअर केली होती. या पोस्टमध्ये बॅकग्राउंडला “ऐ खून के प्यासे, बात सुनो” हे गाणे होते. यानंतर गुजरात पोलिसांनी त्यांच्याविरुद्ध एफआयआर दाखल केला होता. पुढे हे प्रकरण न्यायालयात पोहोचले.