गोव्यात ‘जायाची पूजा’ थाटात संपन्न; महालसा देवीची ११२ वर्षांची परंपरा आजही कायम

गोव्यातील म्हारदोळची महालसा देवी आणि मंगेशी ही सुप्रसिद्ध देवस्थाने आहेत. गोव्याला जाणारा प्रत्येक पर्यटक या दोन ठिकाणी आवर्जून भेट देतो, आणि विशेष म्हणजे ही मंदिरे जवळजवळ आहेत.
गोव्यात ‘जायाची पूजा’ थाटात संपन्न; महालसा देवीची ११२ वर्षांची परंपरा आजही कायम
Photo : Facebook (Goa News Hub)
Published on

राजन चव्हाण/ गोवा

गोव्यातील म्हारदोळची महालसा देवी आणि मंगेशी ही सुप्रसिद्ध देवस्थाने आहेत. गोव्याला जाणारा प्रत्येक पर्यटक या दोन ठिकाणी आवर्जून भेट देतो, आणि विशेष म्हणजे ही मंदिरे जवळजवळ आहेत.

गेल्या मंगळवारी, सालाबादाप्रमाणे, गणेशोत्सवाच्या तृतीय दिवशी महालसा देवीच्या मंदिरात 'जायाची पूजा' पार पडली. 'जायाची पूजा' म्हणजे जाईच्या फुलांनी देवीला सजवणे, तसेच मंदिर आणि परिसर संपूर्ण जाईच्या फुलांच्या माळांनी सजवण्यात आले आहे.

ही फुले लाखोंच्या संख्येने म्हारदोळ आणि प्रियोळ या गावांतून मिळवली जातात. भक्तिभाव, अपार श्रद्धा आणि नाईक फुलकर समाजाच्या मेहनतीमुळे ११२ वर्षांची ही परंपरा आजही जोमाने जपत आहे. या गावांमध्ये सुमारे ६५ नाईक कुटुंबीय मोठ्या प्रमाणावर जाईची लागवड करतात आणि लाखोंच्या संख्येने फुले गोळा करून पूजा करत असतात.

फुलांचे देठ इतके नाजूक असल्यामुळे माळा, हार, गजरे तयार करणे अतिशय कुशल आणि अवघड काम आहे.

मात्र देवीच्या कृपेने हे काम सोपे वाटते, अशी धारणा नाईक मंडळींनी व्यक्त केली. बायका आणि पुरुष मंडळी अंधारात बॅटरी, टॉर्चच्या उजेडात रात्रीपासूनच फुलांची कळ्या खुंटायला सुरुवात करतात, आणि पहाटेपर्यंत माळा, हार व गजरे तयार होतात. नंतर पुरुष मंडळी मंदिर आणि परिसराची सजावट करतात. सजावट झाल्यानंतर जाईच्या सुगंधी वातावरणात महालसा देवीचा उत्सव सुरू होतो.

युवकांना परंपरा सांभाळण्यात कमी स्वारस्य

परंतु, या परंपरेला भविष्यातील धोकेही निर्माण होत आहेत. गावातील तरुण पिढी रोजगारासाठी बाहेर गेल्याने त्यांना ही परंपरा सांभाळण्यात कमी स्वारस्य असल्यामुळे परंपरा कायम राखण्याचे मोठे आव्हानच आहे. संपूर्ण गाव आणि आसपासच्या गावांतील भाविक दिवसभर आणि रात्री उशिरापर्यंत या जत्रेत सहभागी होतात.

परंपरा भविष्यातही जोमाने सुरू राहण्याची आशा

धार्मिक स्थळांचा विस्तार, व्याप वाढ, बिल्डर लॉबी आणि भूमाफियांचा दबाव या बागांवर पडत असल्याने भविष्यात या बागा विकल्या जाऊ शकतात का, अशी चिंता जाणवू लागली आहे.मात्र, गावातील जाणत्या मंडळींनी ठामपणे सांगितले आहे की, या बागा कोणत्याही परिस्थितीत विकल्या जाणार नाहीत आणि ही परंपरा भविष्यातही अशीच जोमाने सुरू राहील, अशी श्रद्धा व्यक्त केली आहे.

logo
marathi.freepressjournal.in