"सरकारनं तात्काळ तोडगा काढावा, अन्यथा..." नीट परीक्षेतील गोंधळावरून अमित ठाकरेंचा केंद्र सरकारला इशारा

"केंद्र सरकारने तात्काळ या गंभीर परिस्थितीचा तोडगा काढून विद्यार्थ्यांच्या मागण्यांवर सकारात्मक विचार करणे गरजेचे आहे. अन्यथा..." नीट परीक्षेतील गोंधळावरून नेमकं काय म्हणाले अमित ठाकरे
"सरकारनं तात्काळ तोडगा काढावा, अन्यथा..." नीट परीक्षेतील गोंधळावरून अमित ठाकरेंचा केंद्र सरकारला इशारा

वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी आवश्यक असलेल्या ‘एनईईटी’ (नीट-NEET) परीक्षा घेणाऱ्या ‘नॅशनल टेस्टींग एजन्सी’च्या कार्यपद्धतीवर अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. यंदा ६७ विद्यार्थ्यांना ७२० पैकी ७२० गुण मिळाले आहेत. नकारात्मक गुण असतानाही ६७ विद्यार्थ्यांना पैकीच्या पैकी गुण मिळाल्यानं ही परीक्षा वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे. ‘नीट’ परीक्षेतील अनियमिततेची सर्वोच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली उच्चस्तरीय चौकशी करण्यात यावी,अशी मागणी शुक्रवारी काँग्रेसने केली होती. दरम्यान आता राज ठाकरे यांचे चिरंजीव अमित ठाकरे यांनीही फेसबुक पोस्टच्या माध्यमातून नीट परीक्षा यंत्रणेतील गोंधळावरून केंद्र सरकारवर टीका केली. हरयाणातील काही विद्यार्थ्यांना ‘नीट’ या परीक्षेत पैकीच्या पैकी मार्क्स मिळतात? हे काय चालले आहे? असा सवाल करत केंद्र सरकारने तात्काळ तोडगा काढावा, अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना, पालक आणि विद्यार्थ्यांना घेवून रस्त्यावर उतरेल, असा इशारा त्यांनी दिला आहे.

नेमकं काय म्हणाले अमित ठाकरे?

"नीटची परीक्षा तरी नीट घ्या !

हरियाणातील काही विद्यार्थ्यांना ‘नीट’ या परीक्षेत पैकीच्या पैकी मार्क्स मिळतात? ६७ मुलांना पैकीच्या पैकी गुण? हे काय चालले आहे? 'नीट' ही परीक्षा आता खाजगी क्लासेस आणि वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये प्रवेश मिळवून देणाऱ्या दलालांच्या ताब्यात गेली आहे का?

परीक्षेत गडबड, विद्यार्थी-पालकांमध्ये अविश्वास, डॉक्टर बनण्याची इच्छा बाळगणारे विद्यार्थी आणि पालक यांच्यात तीव्र संताप, आंदोलने... हे चित्र निश्चितच दुर्दैवी आहे. शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीलाच आंदोलने सुरू आहेत, हे बरे नव्हे!

पेपरफुटीसारख्या घटनांवर नियंत्रण ठेवण्यास अजूनही यंत्रणा अपयशी का? पारदर्शकतेचा अभाव दिसून येतोय. 'नीट' परीक्षा केवळ डॉक्टर बनण्याचा मार्ग नाही तर अनेक विद्यार्थ्यांच्या स्वप्नांचा आणि भविष्याचा आधार आहे. या परीक्षेतील गोंधळामुळे हजारो विद्यार्थ्यांचे मनोबल खचले आहे आणि त्यांच्या आकांक्षांवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे."

अन्यथा रस्त्यावर उतरू...

अमित ठाकरे आपल्या फेसबुक पोस्टमध्ये पुढे लिहितात की, "केंद्र सरकारने तात्काळ या गंभीर परिस्थितीचा तोडगा काढून विद्यार्थ्यांच्या मागण्यांवर सकारात्मक विचार करणे गरजेचे आहे. अन्यथा, महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना, पालक आणि विद्यार्थ्यांना घेवून रस्त्यावर उतरेल. विद्यार्थ्यांच्या भविष्याशी आणि शिक्षणाच्या गरिमेशी खेळ करणं, हे कदापिही सहन केलं जाणार नाही!"

logo
marathi.freepressjournal.in