

नवी दिल्ली : भारताची उत्पादन क्षमता वाढवण्यासाठी आणि जागतिक व्यापारात देशाचे स्थान मजबूत करण्यासाठी उद्योगांनी मुक्त व्यापार करारांचा वापर करावा, उत्पादनांच्या मूल्यवर्धनावर लक्ष केंद्रित करावे, लवचिक पुरवठा साखळी तयार करावी आणि निर्यात बाजारपेठांमध्ये सक्रियपणे विविधता आणावी, असे आवाहन सरकारने गुरुवारी केले.
भारताने स्वाक्षरी केलेले सर्व व्यापार करार हे एका दरवाजासारखे आहेत. पण दरवाजे कितीही सुंदर बनवले तरी ते स्वतःहून उघडत नाहीत. उद्योगांनी स्वतः त्यातून पुढे गेले पाहिजे, असे वाणिज्य विभागाचे अप्पर सचिव यशवीर सिंह यांनी सांगितले.
मॅन्युफॅक्चरिंग कॉन्क्लेव्हमध्ये सिंह म्हणाले की, बाजारपेठेतील पोहोच वाढवणे, गुंतवणूक व तंत्रज्ञान आकर्षित करणे, पुरवठा साखळीत विविधता आणणे आणि जागतिक धक्क्यांचा सामना करू शकतील अशा उत्पादक परिसंस्था तयार करण्यासाठी उद्योगांनी मुक्त व्यापार करारांचा उपयोग केला पाहिजे. जागतिक उत्पादनात फक्त सहभागी होणे एवढाच आमचा उद्देश नसून, भारताला जागतिक मूल्य साखळीत एक विश्वासार्ह, स्पर्धात्मक आणि विश्वासू भागीदार बनवणे हे आमचे ध्येय आहे.
भांडवली वस्तूंची निर्यात : भारताच्या एकूण निर्यातीत भांडवली वस्तूंचा वाटा २०१४ मधील १३% वरून १९% पर्यंत वाढला आहे.
जागतिक बाजारपेठ : भारताने स्वाक्षरी केलेले नवीन व्यापार करार १२ ट्रिलियन डॉलरची आयात करणाऱ्या देशांचे बाजार भारतीय उद्योगांसाठी उघडतात.
आर्थिक सुरक्षेचा धोका : क्रिटिकल मिनरल्स, दुर्मिळ घटकांवर चीनचे असणारे वर्चस्व हा सर्वात मोठा आर्थिक सुरक्षेचा धोका आहे.
भारताचे सामर्थ्य : लोकशाही संस्था, मजबूत डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधा, तरुण कुशल मनुष्यबळ आणि हरित उत्पादन यांमुळे भारत एक सुरक्षित आणि पारदर्शक पुरवठादार ठरत आहे.