नवी दिल्ली : देशात टोमॅटोच्या किमती २०० रुपयांच्या आसपास गेलेल्या असतानाच कांद्याचे दरही वाढू लागले आहेत. त्यामुळे केंद्र सरकार सावध झाले आहे. कांद्याचा बफर स्टॉक खुल्या बाजारात आणण्याची घोषणा केंद्र सरकारने केली आहे. ऑक्टोबरनंतर नवीन पीक बाजारात येणार असल्याने तोपर्यंत कांद्याची दरवाढ रोखण्यासाठी सरकारने हा निर्णय घेतला आहे.
जनतेला कांदा किफायतशीर दरात मिळण्यासाठी सरकार विविध पर्यायाने कांदा विकण्याचा प्रयत्न करत आहे. सरकारकडे सध्या ३ लाख टन कांद्याचा साठा आहे. कांद्याचे दर वाढू लागल्यास सरकार त्यातून पुरवठा करू शकते.
१० ऑगस्ट रोजी कांद्याचे दर सरासरी २७.९० रुपये किलो आहेत. गेल्यावर्षीच्या तुलनेत कांद्याचे दर २ रुपये अधिक आहेत. आम्ही कांद्याचा बफर स्टॉक तत्काळ बाजारात आणणार आहोत, असे ग्राहक संरक्षण खात्याचे सचिव रोहित कुमार सिंह यांनी सांगितले.
ज्या राज्यात किंवा विभागात कांद्याच्या किमती सरासरीपेक्षा जास्त असतील, तेथे कांद्याचा साठा उतरवला जाईल. ‘ई-लिलाव’ व ‘ई-कॉमर्स’चा वापर करून कांदा पुरवला जाईल. राज्य सरकारांना हा कांदा सवलतीच्या दरात पुरवला जाईल. सरकारने यंदा ३ लाख मेट्रिक टन कांद्याचा बफर स्टॉक ठेवला आहे.