मुंबई बॉम्बस्फोटातील गुन्हेगार आणि कुख्यात दहशतवादी याकूब मेमनच्या कबरीचे सुशोभीकरण करण्याचा प्रकार एका वृत्त वाहिनीने समोर आणल्यानंतर पोलीस आणि प्रशासन खडबडून जागे झाले आहे. याकुबच्या कबरीवरील एलईडी दिवे पोलिसांनी काढून टाकले आहेत. काल रात्री पोलिसांच्या पथकाने मरीन लाइन्सच्या बडा कबरस्तानमध्ये जाऊन वस्तुस्थिती तपासल्याचे वृत्त आहे. मुंबईतील गुन्हेगारांची थडगी सजवणाऱ्यांवर लवकरच कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती आहे. या वृत्तानंतर वेगवेगळे प्रश्न उपस्थित होत असून याच मुद्द्यावर आता वेगवेगळ्या राजकीय नेत्यांच्या प्रतिक्रिया येत आहेत. भाजप-काँग्रेसचे नेते एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत आहेत.
याकुब मेमनच्या कबरीच्या सुशोभिकरणावरून भाजप आमदार राम कदम यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना याकुब मेमनच्या समाधीचे सुशोभीकरण करण्यात आल्याचा आरोप भाजप आमदार राम कदम यांनी केला आहे. काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे यांनी ही सर्वात मोठी चूक भाजपची असल्याचे म्हटले आहे.