नवी दिल्ली : हाथरस सत्संगच्या वेळी काही जणांनी विषारी घटकांनी भरलेले डबे गर्दीतच उघडल्याचे आपल्याला ती घटना पाहणाऱ्यांनी सांगितल्याचा दावा भोले बाबाचे वकील ए. पी. सिंह यांनी रविवारी केला. भोले बाबाच्या वाढत्या लोकप्रियतेमुळे कारस्थान रचण्यात आले आणि तेच चेंगराचेंगरीमागील कारण आहे, असेही सिंह यांनी रविवारी येथे एका पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.
घटनेचे साक्षीदार असलेल्यांनी आपल्याशी संपर्क साधला आणि १५-१६ जणांकडे विषारी घटक असलेले डबे होते आणि त्यांनी ते गर्दीतच उघडले, अशी माहिती आपल्याला दिली. शवविच्छेदन अहवाल आपण पाहिला आहे, जखमी झाल्यामुळे नव्हे तर गुदमरल्याने लोकांचा मृत्यू झाल्याचे त्यामध्ये म्हटले आहे, असेही सिंह यांनी सांगितले. या चेंगराचेंगरीमागे कारस्थान असून विषारी घटक घेऊन येणाऱ्या इसमांना तेथून पसार होणे शक्य व्हावे यासाठी तेथे काही गाड्या उभ्या करण्यात आल्या होत्या, याबाबत आमच्याकडे पुरावे असून ते सादर केले जातील, ही बाब आपण प्रथमच जाहीर करीत आहोत, असेही सिंह म्हणाले.