

गुवाहाटी : आसामचे राज्यपाल लक्ष्मण प्रसाद आचार्य यांनी रविवारी डॉ. हिमंता बिस्वा सरमा यांना राज्यात पुढील सरकार स्थापन करण्यासाठी आमंत्रित केले आहे. आसाममधील ‘लोकभवन’ येथे ‘एनडीए’च्या नेत्यांनी राज्यपालांची भेट घेऊन सत्तास्थापनेचा दावा मांडल्यानंतर हे निमंत्रण देण्यात आले. ‘एनडीए’ने सरमा यांच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन करण्याची अधिकृत घोषणा केली.
मुख्यमंत्री म्हणून डॉ. हिमंता बिस्वा सरमा आणि त्यांच्या मंत्रिमंडळातील सदस्यांना राज्यपाल आचार्य हे पद आणि गोपनीयतेची शपथ देतील. हा शपथविधी सोहळा १२ मे रोजी आयोजित करण्यात आला आहे. या सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, भाजपचे अध्यक्ष नितीन नबीन आणि इतर ज्येष्ठ नेते उपस्थित राहण्याची शक्यता आहे. आसाममध्ये २०१६ मध्ये सर्बानंद सोनोवाल यांच्या नेतृत्वाखाली भाजपप्रणित आघाडीने सत्ता मिळवल्यानंतर ‘एनडीए’चा हा सलग तिसरा कार्यकाळ असणार आहे.
२०२१ मध्ये पहिल्यांदा मुख्यमंत्री झालेल्या हिमंता बिस्वा सरमा यांनी याद्वारे नवा इतिहास रचला आहे. आसाममध्ये सलग दोन वेळा मुख्यमंत्रीपद भूषवणारे ते पहिले बिगर-काँग्रेस नेते ठरणार आहेत. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत १२६ सदस्यांच्या सभागृहात 'एनडीए'ने दोन-तृतीयांश बहुमत मिळवले असून एकूण १०२ जागांवर विजय मिळवला आहे. यामध्ये भाजपला ८२ जागा मिळाल्या आहेत, तर मित्रपक्ष 'एजीपी' आणि 'बीपीएफ' यांनी प्रत्येकी १० जागांवर विजय मिळवला आहे.