दिल्लीमध्ये तब्बल २७ वर्षांनी भाजप पुन्हा सत्तेत येणार असल्याचे चित्र जवळपास स्पष्ट होताच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी, 'दिल्ली आता मोदीजींच्या नेतृत्वाखाली एक आदर्श राजधानी बनेल', असा विश्वास व्यक्त केला आहे. शहा यांनी सोशल मीडिया पोस्टद्वारे आपली प्रतिक्रिया दिली.
"दिल्लीतील जनतेने दाखवून दिले की..."
"दिल्लीतील जनतेने दाखवून दिले की, वारंवार खोटी आश्वासने देऊन लोकांची दिशाभूल करता येणार नाही. गलिच्छ यमुना, पिण्याचे अस्वच्छ पाणी, तुटलेले रस्ते, तुंबलेली गटारे आणि प्रत्येक रस्त्यावर उघडलेली दारूची दुकाने यासर्व बाबींवर जनतेने आपल्या मतांनी प्रतिसाद दिला आहे," असे शहा यांनी म्हटले.
पुढे त्यांनी, "दिल्लीतील या भव्य विजयासाठी ज्यांनी रात्रंदिवस काम केले त्या दिल्ली भाजपच्या सर्व कार्यकर्त्यांचे, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांचे आणि प्रदेशाध्यक्ष वीरेंद्र सचदेवा यांचे मनःपूर्वक अभिनंदन. महिलांचा आदर असो, अनधिकृत वसाहतीतील रहिवाशांचा स्वाभिमान असो किंवा स्वयंरोजगाराच्या अफाट शक्यता असो, दिल्ली आता मोदीजींच्या नेतृत्वाखाली एक आदर्श राजधानी बनेल", असा विश्वासही व्यक्त केला.
दरम्यान, दिल्ली विधानसभा निवडणुकांच्या ट्रेंडमध्ये, भाजप २७ वर्षांनंतर सत्तेत परतताना दिसत आहे. 'आप'चे दोन्ही मोठे नेते अरविंद केजरीवाल आणि मनिष सिसोदिया यांना पराभवाचा सामना करावा लागलाय. तर मुख्यमंत्री अतिशी यांनी मात्र कसाबसा विजय मिळवला आहे.