यंदा मे महिन्यात उष्णतेच्या लाटेचे सर्व विक्रम मोडीत; दीड अंश सेल्सिअस तापमान वाढले; शास्त्रज्ञांनी दिली महत्त्वाची माहिती

यंदाचा उन्हाळा अत्यंत तीव्र होता. या उन्हाची दाहकता भारतीयांनी अनुभवली. भारतात यंदा मे महिन्यात आलेल्या उष्णतेच्या लाटेने आतापर्यंतचे सर्व विक्रम मोडले.
संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्रपीटीआय

नवी दिल्ली : यंदाचा उन्हाळा अत्यंत तीव्र होता. या उन्हाची दाहकता भारतीयांनी अनुभवली. भारतात यंदा मे महिन्यात आलेल्या उष्णतेच्या लाटेने आतापर्यंतचे सर्व विक्रम मोडले. या उष्णतेच्या लाटेमुळे मे महिन्यात दीड अंश सेल्सिअस तापमान वाढले, अशी माहिती हवामान बदलविषयक शास्त्रज्ञांनी दिली.

अल-निनो प्रभाव, मध्य व पूर्व प्रशांत महासागराच्या पृष्ठभागाचे तापमान असामान्यपणे वाढल्याने यंदा भारतात उष्णतेची भीषण लाट आली. तसेच कार्बन डायऑक्साईड गॅससहित विषारी वायूंचे उत्सर्जन वाढल्याने उष्णता वाढली आहे. त्यातच पेट्रोल-डिझेलचा वापर वाढल्याने भारतातील उष्णतेची लाट ही यंदा सहनशीलतेच्या पलीकडे गेली आहे, असे वैज्ञानिकांचे म्हणणे आहे.

भारतात उष्णता वाढण्याचा अभ्यास वैज्ञानिकांनी केला. १९७९ ते २००१ तर २००१ ते २०२३ दरम्यानच्या तापमानाची तुलना करून वैज्ञानिक म्हणाले की, भारतात यंदा मेमध्ये सर्वात जास्त उष्णतेची लाट दिसून आली. त्यात सरासरी तापमानापेक्षा दीड अंश तापमान अधिक होते.

देशात निवडणुकीच्या काळात मतदान कमी होण्यास प्रचंड उष्णता कारणीभूत होती. देशातील १५० मोठ्या जलाशयातील पाणी घटून केवळ २२ टक्के राहिले. विजेची मागणी वाढल्याने अनेक राज्यांत विजेचे भारनियमन करावे लागले. फ्रेंच नॅशनल सेंटर फॉर सायंटिफिक रिसर्चचे डेव्हीड फ्रांडा यांनी सांगितले की, भारतातील तापमान ५० अंशाच्या आसपास पोहोचले आहे. त्यावर कोणतीही तांत्रिक उपाययोजना समोर दिसत नाही. आता कार्बन डायऑक्साईडचे उत्सर्जन कमी करण्याचे प्रयत्न करणे गरजेचे आहे.

२५ हजार जणांना उष्माघाताचा फटका

केंद्रीय आरोग्य खात्याच्या आकडेवारीनुसार, देशात २५ हजार जणांना उष्माघाताचा फटका बसला. त्यातील ५६ जणांचा मृत्यू उष्णतेशी संबंधित आजारांनी झाला, यातील ४६ मृत्यू एकट्या मे महिन्यामध्ये झाले.

भविष्यात उष्णतेच्या लाटा अतिभयानक असतील

सिंगापूर विद्यापीठाच्या वैज्ञानिकांनी सांगितले की, भविष्यात उष्णतेच्या लाटा अतिभयानक असतील. अल-निनो प्रभाव व वातावरण बदलामुळे उष्णता वाढत आहे. यंदा वायव्य भारताच्या व मध्य भारताच्या अनेक भागांत उष्णतेचा प्रकोप जीवघेणा होता. अनेक राज्यांत उष्णतेमुळे नागरिकांचे बळी गेले.

logo
marathi.freepressjournal.in