निवडकर्ते जो काही निर्णय घेतात, त्याचा मला आदर आहे. निवडकर्त्यांना वाटले असेल त्यांनी निवडलेले खेळाडू माझ्यापेक्षा चांगल्या प्रकारे खेळतील. जीवनात अनेक चढउतार येत असतात आणि त्या गोष्टींचा स्वीकार करायला हवा. आपण फक्त आपल्या ध्येयावर लक्ष केंद्रित करायला हवे, अशी भावूक प्रतिक्रिया टीम इंडियातील डच्चूनंतर शिखर धवनने व्यक्त केली.
धवन म्हणाला की, मी भावनांवर नियंत्रण मिळवू शकतो. मला संधीचे फक्त सोने करायचे माहीत आहे. आपल्या जीवनात आपण जे काम करतो, त्यावर हृदयातून प्रेम करता आले पाहिजे. त्यात कमीपणा वाटला नाही, तरच ते काम तुम्ही एन्जॉय करू शकाल. आताच्या पिढीला सर्व गोष्टी ताबडतोब हव्या असतात; पण माझ्या मते काही गोष्टी लगेच मिळत नसतात.
त्याने पुढे सांगितले की, आता मी ज्या ठिकाणी पोहोचलो आहे, ते शिखर गाठण्यासाठी मला पाच वर्षे नव्हे, तर २५ वर्षे लागली आहेत. मी फक्त इतकच सांगू शकतो की, जो काय प्रवास असेल तो एन्जॉय करा. जीवन खूप सुंदर आहे. त्याचा शोध चांगल्याप्रकारे घेणे गरजेचे आहे. तुम्ही जिथे जाल तिथे आनंद पसरवता यायला हवा. धवन म्हणाला की, मी सकारात्मक दृष्टिकोन ठेवतो. गेल्या वर्षी भारतीय संघाची लीडरशीप करणे म्हणजे स्वप्न पूर्ण झाल्यासारखे आहे. दरम्यान, दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी-२० मालिकेसाठी रोहित शर्मा, विराट कोहली, मोहम्मद शमी आणि जसप्रीत बुमराह यांना विश्रांती देण्यात आली आहे. त्याचवेळी अष्टपैलू हार्दिक पांड्याने पुनरागमन केले आहे.