
नवी दिल्ली : जेव्हा मी रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाचा कार्यभार स्वीकारला, तेव्हा मी रस्ते अपघात ५० टक्के कमी करण्याचे लक्ष्य ठेवले होते. मात्र, त्यात आणखी वाढ झाली. त्यामुळे यासंदर्भात परदेशात होणाऱ्या मीटिंगमध्ये तोंड लपवण्याचा प्रयत्न करावा लागतो, अशी खंत केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी गुरुवारी लोकसभेत व्यक्त केली.
अपघात कमी करणे तर सोडा, पण हे प्रमाण वाढले आहे हे मान्य करायला मला लाज वाटत नाही. त्यामुळे कोणत्याही आंतरराष्ट्रीय परिषदेत जेव्हा रस्ते अपघातांची चर्चा होते तेव्हा मी तोंड लपवण्याचा प्रयत्न करतो, असे गडकरी म्हणाले.
लोकसभेत प्रश्नोत्तराच्या तासादरम्यान यासंबंधीच्या प्रश्नाला उत्तर देताना नितीन गडकरी म्हणाले की, जेव्हा मानवी वर्तन व समाजात बदल होईल आणि कायद्याचा आदर होईल, तेव्हाच भारतातील परिस्थिती बदलेल. त्यांचा वैयक्तिक अनुभव सांगताना ते म्हणाले की, काही वर्षांपूर्वी त्यांचा आणि त्यांच्या कुटुंबाचा मोठा रस्ता अपघात झाला, ज्यामध्ये त्यांना बराच काळ रुग्णालयात राहावे लागले. देवाच्या कृपेने मी आणि माझे कुटुंब वाचलो. त्यामुळे मला अपघातांचा वैयक्तिक अनुभव आहे.
रस्त्यावर ट्रक उभे केल्याने अपघात वाढतात
रस्त्यावर ट्रकचे पार्किंग हे अपघातांचे प्रमुख कारण आहे आणि अनेक ट्रक लेनची शिस्त पाळत नाहीत. मी भारतात बस बॉडी तयार करण्यासाठी आंतरराष्ट्रीय मानकांचा अवलंब करण्याचे आदेश दिले आहेत. बसच्या खिडकीजवळ हातोडा असावा, जेणेकरून अपघात झाल्यास खिडकी सहज तोडता येईल, असे गडकरी यांनी सांगितले.