बस्तर (छत्तीसगड) : लोकसभेच्या निवडणुकीनंतर केंद्रात काँग्रेसचे सरकार आले तर देशात त्वरित जातनिहाय जनगणना केली जाईल, असे काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी शनिवारी येथे सांगितले. छत्तीसगडच्या बस्तर जिल्ह्यात ते एका निवडणूक जाहीर सभेत बोलत होते.
लोकसभेची आगामी निवडणूक दोन विचारसरणींमधील आहे, एक विचारश्रेणी घटनेचे रक्षण करणारी आहे तर दुसरी घटनेचा नाश करणारी आहे, असे गांधी म्हणाले. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या आदिवासी असल्याने त्यांना अयोध्येतील राम मंदिरात प्राणप्रतिष्ठा समारंभाला हजर राहण्यापासून अटकाव करण्यात आला आणि त्यावरून भाजपची मानसिकता प्रतिबिंबित होते, असेही ते म्हणाले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आदिवासी हा शब्दच बदलण्याच्या प्रयत्नात आहेत, आम्ही तुम्हाला आदिवासी म्हणतो परंतु ते वनवासी हा शब्दप्रयोग करतात, आदिवासी आणि वनवासी यामध्ये फार मोठा फरक आहे. आदिवासी शब्दाचा अर्थ अत्यंत गहन आहे, हा शब्द तुमचा जल, जंगल आणि जमिनीवरील हक्क सांगतो तर वनवासी म्हणजे जे जंगलात वास्तव्य करतात ते, असेही ते म्हणाले.
भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (आरएसएस) आदिवासींच्या धर्म, विचारसरणी आणि इतिहासावर हल्ला करीत आहेत, भाजप तुमच्या जमिनी अब्जाधीशांना बहाल करीत आहेत, असेही राहुल गांधी म्हणाले.