
हैदराबाद : तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव हे देशातील भ्रष्टाचारात पहिल्या क्रमांकावरचे असून राज्यात भाजप सत्तेवर आल्यास त्यांच्या बीआरएस सरकारची चौकशी केली जाईल, त्यांच्या भ्रष्टाचाराच्या व्यवहारांची तपासणी केली जाईल व संबंधित गुन्हेगारांना तुरुंगात टाकले जाईल, असे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी जनगाव येथील निवडणूक प्रचारसभेत बोलताना सांगितले.
यावेळी बीआरएसच्या राजवटीतील कालेश्वरम प्रकल्प, मद्य घोटाळा व मियापूर येथील भूखंड व्यवहार अशा घोटाळ्यांच्या संबंधाचेही संदर्भ त्यांनी दिले.
दोन दिवसांपूर्वी प्रसिद्ध झालेल्या भाजपच्या जाहीरनाम्यातही म्हटले आहे की, भाजप तेलंगणात सत्तेवर आल्यावर, कालेश्वरम आणि धारणीसह विकासाच्या नावाखाली सुरू केलेल्या विविध प्रकल्पांच्या खर्च व भ्रष्टाचारासंबंधात चौकशी आयोग नियुक्त करेल.
तेलंगणात ३० नोव्हेंबरला विधानसभा निवडणूक होत असून यात पक्षाला सत्ता मिळाल्यास मागास जातीच्या नेत्याला राज्याचा मुख्यमंत्री बनविण्याच्या आणि अयोध्येतील राम मंदिरात मोफत दर्शनाची व्यवस्था करण्याच्या भाजपच्या वचनाचा शहा यांनी पुनरुच्चार केला.