ऑगस्ट महिन्यात भारतातील उत्पादन उद्योगाच्या कामांमध्ये सुधारणा झाली आहे. तथापि, एस ॲण्ड पी ग्लोबलचा पीएमआय (पर्चेसिंग मॅनेजर्स इंडेक्स ) जुलैमधील ५६.४ च्या तुलनेत किरकोळ कमी होऊन ५६.२ वर आला आहे. ५० च्या वरचा पीएमआय आकडा व्यावसायिक क्रियाकलापांमध्ये सुधारणा दर्शवतो. ऑगस्ट महिन्यात, पीएमआय निर्देशांकाचे आकडे सलग चौदाव्या महिन्यात ५० अंकांच्या वर आहेत. महागाई वाढत असली तरी मागणीही वाढली आहे. त्यामुळे महागाईचा परिणाम कमी झालेला दिसतो.
एस ॲण्ड पी ग्लोबलने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, देशातील मागणीच्या परिस्थितीत सातत्याने सुधारणा होत असल्याने ऑगस्ट महिन्यात देशातील उत्पादन उद्योगाला मिळालेल्या ऑर्डरमध्ये वाढ झाली आहे. त्यामुळे उत्पादन वाढ गेल्या नऊ महिन्यांतील सर्वोच्च पातळीवर पोहोचली आहे. निर्यातीतील वाढ आणि आगामी आर्थिक वर्षातील चांगला ट्रेंड यामुळे या महिन्यात देशातील उत्पादन क्रियाकलापांना चालना मिळाली. एस ॲण्ड पी ग्लोबलच्या अहवालानुसार, सर्वेक्षण केलेल्या कंपन्यांना त्यांच्या उत्पादनांच्या किमती आणि मार्जिनमध्ये वाढ अपेक्षित आहे. अलिकडच्या काळात वस्तूंच्या किमतीत झालेल्या घसरणीमुळे महागाईची चिंता कमी झाल्याचे या कंपन्यांचे मत आहे. एस ॲण्ड पी ग्लोबलच्या सर्वेक्षण अहवालानुसार, ऑगस्ट महिन्यात उत्पादन खर्चही गेल्या एका वर्षातील नीचांकी पातळीवर आला आहे.