
नवी दिल्ली : २०२५-२६ या आर्थिक वर्षासाठी आतापर्यंत सहा कोटींपेक्षा अधिक प्राप्तिकर विवरणपत्रे दाखल झाली आहेत. प्राप्तिकर विवरणपत्रे भरण्याचा उद्या (सोमवारी) शेवटचा दिवस आहे. त्यामुळे लेटलतीफ प्राप्तिकर दात्यांची विवरणपत्र भरण्यासाठी घाई सुरू आहे.
आत्तापर्यंत दाखल झालेल्या सहा कोटी प्राप्तिकर विवरणपत्रांचा टप्पा गाठण्यात मदत केल्याबद्दल करदाते आणि कर व्यावसायिकांचे आभार आणि आकडेवारी अजून वाढतच आहे, असे प्राप्तिकर खात्याने 'एक्स'च्या पोस्टमध्ये म्हटले.
करदात्यांना आयटीआर फाइलिंग, कर भरणा आणि इतर संबंधित सेवांसाठी मदत करण्याकरिता आमचा हेल्पडेस्क २४x७कार्यरत आहे, तसेच कॉल्स, लाइव्ह चॅट्स, वेबएक्स सत्रे आणि द्विटर/एक्सच्या माध्यमातून मदत दिली जात आहे, असेही विभागाने सांगितले.
ज्यांनी अजून २०२५-२६ या मूल्यांकन वर्षासाठी विवरणपत्र दाखल केलेले नाही, त्यांनी शेवटच्या क्षणी होणारी गर्दी टाळण्यासाठी लवकरात लवकर विवरणपत्र दाखल करावे, असे आवाहनही करण्यात आले.
मे महिन्यात प्राप्तिकर विभागाने व्यक्ती, हिंदू अविभाजित कुटुंबे आणि ज्या संस्था आपले खाते ऑडिट करून घ्यायचे नाहीत त्यांच्यासाठी २०२५-२६ या मूल्यांकन वर्षासाठी (आर्थिक वर्ष २०२४-२५ साठी मिळालेल्या उत्पन्नावर) प्राप्तिकर विवरणपत्र दाखल करण्याची अंतिम तारीख ३१ जुलैवरून १५ सप्टेंबरपर्यंत वाढवण्याची घोषणा केली होती.
विवरणपत्र दाखल करण्याच्या संख्येत वर्षानुवर्षे सातत्याने वाढ होत आहे. ज्यातून कर अनुपालनात वाढ आणि करआधाराचा विस्तार दिसून येतो. २०२४-२५ या मूल्यांकन वर्षासाठी ३१ जुलै २०२४ पर्यंत विक्रमी ७.२८ कोटी विवरणपत्रे दाखल झाली होती. जे २०२३-२४ या वर्षाच्या ६.७७ कोटी रिटर्न्सच्या तुलनेत ७.५ टक्के वार्षिक वाढ दर्शवतात.