सत्ताधारी-विरोधक आमनेसामने; अधिवेशनापूर्वीच लोकसभा हंगामी अध्यक्षांचा प्रश्न

लोकसभेच्या पहिल्या अधिवेशनाला सुरुवात होण्यापूर्वीच केंद्रातील एनडीए सरकार आणि विरोधकांची इंडिया आघाडी लोकसभेच्या हंगामी अध्यक्षांच्या प्रश्नावरून एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत.
सत्ताधारी-विरोधक आमनेसामने; अधिवेशनापूर्वीच लोकसभा हंगामी अध्यक्षांचा प्रश्न
संग्रहित छायाचित्र
Published on

नवी दिल्ली : लोकसभेच्या पहिल्या अधिवेशनाला सुरुवात होण्यापूर्वीच केंद्रातील एनडीए सरकार आणि विरोधकांची इंडिया आघाडी लोकसभेच्या हंगामी अध्यक्षांच्या प्रश्नावरून एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत. काँग्रेस खोटारडेपणा करीत असल्याचा आरोप संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी केला आहे, तर विरोधकांनी पीठासीन अधिकाऱ्यांच्या पॅनलमध्ये सहभागी होण्यास नकार दिला आहे.

लोकसभेच्या हंगामी अध्यक्षांना सहकार्य करण्यासाठी विरोधी पक्षांच्या नेत्यांची अध्यक्षांच्या पॅनलमध्ये नियुक्ती करण्यात आली असली, तरी या पॅनलमध्ये काम करावयाचे नाही असा विचार विरोधी पक्षांचे नेते करीत असल्याचे सूत्रांनी सांगितले.

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी लोकसभेच्या हंगामी अध्यक्षपदी भाजपचे ज्येष्ठ खासदार भर्तृहारी माहताब यांची नियुक्ती केली त्याला विरोधी पक्षांनी आक्षेप घेतला आहे. लोकसभेच्या अध्यक्षांची निवड २६ जून रोजी केली जाणार आहे, तोपर्यंत पीठासीन अधिकारी म्हणून माहताब यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

संसदेच्या विशेष अधिवेशनामध्ये लोकसभेच्या नवनिर्वाचित सदस्यांना शपथ देण्यासाठी हंगामी अध्यक्षांची नियुक्ती करण्यात आली असून पीठासीन अधिकाऱ्यांच्या पॅनलमध्ये विरोधी पक्षांमधील सदस्यांचीही नियुक्ती करण्यात आली आहे. काँग्रेसचे नेते के. सुरेश, तृणमूलचे नेते सुदीप बंदोपाध्याय आणि द्रमुकचे नेते टी. आर. बालू यांची पॅनलमध्ये नियुक्ती करण्यात आली असली तरी ही जबाबदारी न स्वीकारण्याचा हे तीन नेते विचार करीत असल्याचे सूत्रांनी सांगितले. भाजपचे राधामोहन सिंह आणि फग्गनसिंह कुलस्ते हेही या पॅनलमधील अन्य सदस्य आहेत.

काँग्रेसचे सदस्य के. सुरेश हे माहताब यांच्यापेक्षा ज्येष्ठ असल्याची हरकत काँग्रेसच्या काही नेत्यांनी घेतली आहे. माहताब हे लोकसभेत सर्वात अधिक काळ विनाखंड निवडून येणारे सदस्य असल्याने त्यांची हंगामी अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आल्याचे संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी म्हटले आहे. के. सुरेश हे १९९८ आणि २००४ मध्ये लोकसभेचे सदस्य नव्हते. त्यामुळे माहताब हेच ज्येष्ठ असल्याचा दावा रिजिजू यांनी केला आहे.

logo
marathi.freepressjournal.in