महामेळावा व्यक्तिकेंद्रित नसून लोकशाही रक्षणासाठी; काँग्रेसने केली भूमिका स्पष्ट

इंडिया आघाडीतील सर्व घटक पक्ष त्यामध्ये सहभागी होणार आहेत, असे रमेश म्हणाले. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) अटक केल्यानंतर 'आप'च्या नेत्यांनी मेळाव्याचे आयोजन केल्याचे सांगण्यात येत होते. या पार्श्वभूमीवर रमेश यांनी या मेळाव्याचा उद्देश स्पष्ट केला.
महामेळावा व्यक्तिकेंद्रित नसून लोकशाही रक्षणासाठी; काँग्रेसने केली भूमिका स्पष्ट

नवी दिल्ली : 'इंडिया' आघाडीने दिल्लीच्या रामलीला मैदानावर रविवारी 'लोकतंत्र बचाव मेळावा' या महामेळाव्याचे आयोजन केले आहे. हा मेळावा एका व्यक्तीच्या संरक्षणासाठी नाही, तर घटना आणि लोकशाहीच्या रक्षणासाठी आयोजित करण्यात आला आहे, असे शनिवारी काँग्रेसने स्पष्ट केले.

रविवारी होणाऱ्या या महामेळाव्यातून पंतप्रधानांचे निवासस्थान असलेल्या लोककल्याण मार्गावर, भाजपच्या नेतृत्वाखालील सरकारची मुदत आता भरली आहे, असा कडक संदेश पाठविण्यात येणार आहे, असेही काँग्रेसने म्हटले आहे. या मेळाव्याला काँग्रेस नेते राहुल गांधी आणि पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्यासह अनेक नेते संबोधित करणार आहेत, असे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जयराम रमेश यांनी येथे एका पत्रकार परिषदेत सांगितले. उद्याचा महामेळावा हा व्यक्तिकेंद्रित नाही. म्हणूनच त्याला 'लोकतंत्र बचाव मेळावा' असे म्हटले जात आहे. हा कोणत्याही एका पक्षाचा मेळावा नाही. त्यामध्ये २७-२८ पक्षांचा सहभाग आहे. इंडिया आघाडीतील सर्व घटक पक्ष त्यामध्ये सहभागी होणार आहेत, असे रमेश म्हणाले. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) अटक केल्यानंतर 'आप'च्या नेत्यांनी मेळाव्याचे आयोजन केल्याचे सांगण्यात येत होते. या पार्श्वभूमीवर रमेश यांनी या मेळाव्याचा उद्देश स्पष्ट केला.

महागाई, बेरोजगारीविरुद्ध आवाज उठवणार

इंडिया आघाडीत एकता असल्याचा संदेशही या मेळाव्याद्वारे दिला जाणार आहे. त्याचप्रमाणे वाढती महागाई, बेरोजगारी, शेतकऱ्यांवर होणारा अन्याय याविरुद्धही मेळाव्यात आवाज उठविण्यात येणार आहे. केंद्रीय यंत्रणांचा होत असलेला गैरवापर, विरोधकांचे आर्थिक आणि राजकीय खच्चीकरण, भाजपचा 'कर दहशतवाद' आदी मुद्देही उपस्थित केले जाणार आहेत, असेही ते म्हणाले.

logo
marathi.freepressjournal.in