इंडिया आघाडी अन्यायाशी लढा देईल -राहुल गांधी

भारत जोडो यात्रा गुरुवारी रात्री अलीपूरदौर जिल्ह्यातील फलाकटा येथे थांबणार आहे
इंडिया आघाडी अन्यायाशी लढा देईल -राहुल गांधी

कूच बिहार (प. बंगाल) : कॉँग्रेसची राहुल गांधींच्या नेतृत्वाखालील भारत जोडो न्याय यात्रेचे गुरुवारी आसाममधून प. बंगालच्या कूचबिहार जिल्ह्यात आगमन झाले. कॉँग्रेसचे प. बंगालमधील प्रदेशाध्यक्ष अधीर रंजन चौधरी यांनी यात्रेचे स्वागत केले. त्यानंतर राहुल गांधी यांनी इंडिया आघाडी एकजुटीने देशातील अन्यायाशी लढा देईल, असा विश्वास व्यक्त केला. प. बंगालच्या मुख्यमंत्री आणि इंडिया आघाडीतील प्रमुख नेत्या ममता बॅनर्जी यांनी बुधवारीच कॉँग्रेसशी जागावाटपबाबत बोलणी फिसकटल्यामुळे एकट्यानेच स्वबळावर लोकसभा निवडणूक लढवण्याचा निर्धार जाहीर केला होता. त्यानंतर राहुल गांधी यांनी गुरुवारी इंडिया आघाडी एकजुटीने लढेल, असा विश्वास व्यक्त केला आहे.

 भारत जोडो यात्रा गुरुवारी रात्री अलीपूरदौर जिल्ह्यातील फलाकटा येथे थांबणार आहे. जानेवारी २६ आणि २७ दोन दिवस विश्रांती घेतल्यानंतर जलपायगुरी, अलीपूरदौर, उत्तर दिंजापूर आणि दार्जीलिंग जिल्ह्यातून ही यात्रा २९ जानेवारी रोजी बिहारमध्ये प्रवेश करेल. त्यानंतर ३१ जानेवारी रोजी माल्डामार्गे पुन्हा प. बंगालमध्ये प्रवेश करेल. अंतत: १ फेब्रुवारी रोजी ही यात्रा बंगालमधून बाहेर पडेल. बंगालमध्ये पाच दिवसांत सहा जिल्ह्यांत ही यात्रा प्रवास करेल. एप्रिल-मे २०२१ नंतर राहुल गांधी या यात्रेनिमित्त प्रथमच बंगालला भेट देत आहेत.  दरम्यान, काँग्रेसचे महासचिव जयराम रमेश यांनी तृणमूल काँग्रेससोबत एकत्र बसून चर्चेतून जागावाटप तिढा सोडवू, असा ठाम विश्वास व्यक्त केला आहे. रमेश बागडोरा विमानतळावर पत्रकारांशी संवाद साधत होते. ते म्हणाले, ममता बॅनर्जी यांच्याशिवाय इंडिया आघाडीचा विचारच होऊ शकत नाही. आपणास भाजपला बंगाल आणि देशात हरवायचे असेल तर ममता बॅनर्जींसोबत हव्यातच. आमचे नेते सोनिया गांधी, राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खर्गे यांच्या मनात ममता बॅनर्जी यांच्याविषयी खूप आदर आहे, अशा शब्दांत रमेश यांनी ममता बॅनर्जी यांच्याबाबत सद्भावना व्यक्त केली.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in