इंडिया आघाडीची संसदेबाहेर निदर्शने

अदानी लाचखोरीच्या प्रश्नावरून मंगळवारी संसदेच्या संकुलात इंडिया आघाडीतील अनेक खासदारांनी निदर्शने केली आणि या प्रकरणाची संयुक्त संसदीय समितीमार्फत (जेपीसी) चौकशीची मागणी केली.
इंडिया आघाडीची संसदेबाहेर निदर्शने
एक्स
Published on

नवी दिल्ली : अदानी लाचखोरीच्या प्रश्नावरून मंगळवारी संसदेच्या संकुलात इंडिया आघाडीतील अनेक खासदारांनी निदर्शने केली आणि या प्रकरणाची संयुक्त संसदीय समितीमार्फत (जेपीसी) चौकशीची मागणी केली.

काँग्रेस, आप, राजद, शिवसेना (उबाठा), द्रमुक आणि डाव्या पक्षांचे खासदार निदर्शनांमध्ये सहभागी झाले होते. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात घोषणाबाजी करण्यात आली. संसदेच्या मकरद्वारकडे जाणाऱ्या पायऱ्यांवर लोकसभेतली विरोधी पक्षनेते राहुल गांधी, आपचे संजय सिंह, राजदच्या मिसा भारती आणि शिवसेनेचे (उबाठा) अरविंद सावंत निदर्शनांमध्ये सहभागी झाले होते.

राहुल गांधी यांनी फेसबुकवर एक पोस्ट टाकली असून त्यामध्ये अदानींकडून कोणाला लाभ झाला, मोदीजी, पंतप्रधानांचे मौन बरेच काही सांगून जाते, असे म्हटले आहे. तर सपाने संभल हिंसाचाराच्या मुद्द्याला प्राधान्यक्रम दिला आहे.

संभल प्रश्नावरून लोकसभेत विरोधी सदस्यांचा सभात्याग

उत्तर प्रदेशातील संभल येथे हिंसाचाराचा उद्रेक झाला त्या मुद्द्यावरून मंगळवारी लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यासह संपूर्ण विरोधी पक्षांच्या सदस्यांनी सभात्याग केला. प्रश्नोत्तराच्या तासाला सुरुवात होणार असतानाच सपाचे नेते अखिलेश यांनी संभलचा मुद्दा उपस्थित केला. हा अत्यंत गंभीर प्रश्न आहे. हिंसाचारामध्ये पाच जणांचा मृत्यू झाला आहे, असे अखिलेश यांनी अध्यक्ष ओम बिर्ला यांना सांगण्याचा प्रयत्न केला. मात्र शून्य प्रहराला हा प्रश्न उपस्थित करा, असे बिर्ला यांनी सांगितले तेव्हा अखिलेश आणि त्यांच्या पक्षाचे सदस्य सभागृहाबाहेर गेले आणि विरोधी पक्षांच्या सदस्यांनी सभात्याग केला.

logo
marathi.freepressjournal.in