

नवी दिल्ली : भारताला संरक्षण क्षेत्रात आणखी एक यश मिळाले आहे. संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेने (DRDO) भावी पिढीतील आकाश क्षेपणास्त्र यंत्रणा म्हणजे ‘आकाश-एनजी’ (Akash-NG आकाश नेक्स जनरेशन) ची चाचणी यशस्वीरित्या पूर्ण केली आहे. यामुळे ही क्षेपणास्त्र यंत्रणा भारतीय संरक्षण दलात सामील होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या चाचणीच्या काळात ‘आकाश एनजी’ क्षेपणास्त्र यंत्रणेने वेगवेगळ्या हवाई धोक्यांच्या विरोधात अचूक कार्यक्षमता दाखवली. या क्षेपणास्त्र प्रणालीने वेगवान व कमी उंचीवरील लक्ष्यांसोबतच दूरवरील व अधिक उंचीवरील लक्ष्य भेदले.
हे क्षेपणास्त्र पूर्णपणे स्वदेशी तंत्रज्ञानाने बनवले असून देशात विकसित झालेल्या ‘रेडियो फ्रीक्वेन्सी’ यंत्रणा लावली आहे. यात डयूल पल्स सॉलिड रॉकेट मोटारचा वापर केला आहे. त्यामुळे क्षेपणास्त्राला अधिक ताकद मिळते. या यंत्रणेतील रडार व कमांड व कंट्रोल हे स्वदेशी आहेत. एकाचवेळी अनेक लक्ष्यांना भेदण्याची या यंत्रणेत क्षमता आहे. त्याचा पल्ला ३० किमी व १८ किमी उंचीवर हे क्षेपणास्त्र मारा करू शकते. हे क्षेपणास्त्र लढाऊ विमान, हेलिकॉप्टर, ड्रोन, क्रूज मिसाइल आणि हवेतून जमिनीवर मारा करणाऱ्या क्षेपणास्त्रांचा मुकाबला करू शकते. या क्षेपणास्त्रांना पाकिस्तान किंवा चीनच्या सीमेजवळ तैनात केल्यास ७० ते ८० किमीच्या टप्प्यातील हवाई लक्ष्यांना ते नष्ट करू शकते, असे सूत्रांनी सांगितले.
ही चाचणी चंदीगढ येथील टर्मिनल बॅलिस्टिक्स रिसर्च लॅबोरेटरीच्या रेल ट्रॅक रॉकेट स्लेड (आरटीआरएस) येथे करण्यात आली. या चाचणी यशस्वी झाल्याने भारताची संरक्षण तयारी अधिक सक्षम होईल. तसेच स्वदेशी संरक्षण संशोधनाला नवीन दिशा मिळू शकेल.